PCMC Health Alert – गेल्या काही दिवसांपासून पिंपरी-चिंचवड शहरात डोळे येण्याच्या (कंजंक्टिव्हायटिस) रुग्णांमध्ये मोठी वाढ झाली आहे. हा आजार स्पर्शजन्य असल्याने त्याचा प्रसार वेगाने होत आहे. विशेषतः शालेय मुलांमध्ये याचे प्रमाण अधिक दिसून येत आहे. डोळे लाल होणे, खाज सुटणे किंवा पाणी येणे अशी लक्षणे दिसताच तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. डोळे येण्याचा आजार हा संपर्कातून पसरतो. शाळेत मुले एकमेकांसोबत खेळत असताना नकळतपणे डोळ्यांना वारंवार हात लावतात. तसेच एकमेकांच्या वस्तू वापरल्याने हा संसर्ग वेगाने पसरतो. त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांच्या आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे असून, संसर्ग झालेल्या मुलांना काही दिवस शाळेत न पाठवणे हिताचे ठरते. यामुळे होतो आजार हा आजार प्रामुख्याने व्हायरस किंवा बॅक्टेरियाच्या संसर्गामुळे होतो. बाधित व्यक्तीच्या डोळ्यातील स्त्रावाशी संपर्क आल्यास किंवा त्यांनी वापरलेला रुमाल, टॉवेल वापरल्यास संसर्ग होतो. वातावरणातील बदलांमुळेही या आजाराची साथ पसरते. यासाठी हात स्वच्छ धुण्यावर भर द्यावा, कारण हाताद्वारेच विषाणू डोळ्यांपर्यंत पोहोचतात. डोळ्यांना सतत हात लावणे किंवा चोळणे टाळावे. स्वतःचा रुमाल, टॉवेल आणि कपडे स्वतंत्र ठेवावेत. कुटुंबातील इतर सदस्यांनी या वस्तू वापरू नयेत. डोळे स्वच्छ पाण्याने हलक्या हाताने पुसावेत. डॉक्टरांचा सल्ला घ्या डॉक्टरांच्या मते, डोळे आल्यानंतर त्याकडे वेळीच लक्ष न दिल्यास संसर्ग वाढून बुबुळाला इजा होण्याचा धोका असतो. वेळीच योग्य उपचार आणि सल्ला घेतल्यास हा आजार साधारणतः सात ते आठ दिवसांत बरा होतो. मात्र, घरगुती उपाय किंवा औषधांच्या दुकानातून परस्पर ड्रॉप्स घेणे धोकादायक ठरू शकते. त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. याठिकाणी घेऊ शकतात उपचार शहरातील मासुळकर कॉलनी येथील मनपाच्या शंकरराव मासुळकर अर्बन हेल्थ सेंटर आणि नेत्र रुग्णालय येथे डोळ्यांच्या उपचारासाठी मोठी टीम कार्यरत आहे. या रुग्णालयात चार फॅकल्टी डॉक्टर, सहा पदव्युत्तर शिक्षण पूर्ण झालेले डॉक्टर आणि नऊ पदव्युत्तर शिक्षण घेणारे डॉक्टर तैनात आहेत. दररोज सुमारे २२० रुग्णांची ओपीडी या ठिकाणी तपासली जाते. वायसीएम रुग्णालयात गरज भासल्यास इथले दोन डॉक्टर ऑन कॉल उपलब्ध असतात. “डोळा हा अत्यंत संवेदनशील अवयव आहे. सध्या डोळे येण्याची साथ सुरू असल्याने नागरिकांनी अधिक सावध राहणे गरजेचे आहे. डोळे लाल होणे, खाज सुटणे किंवा डोळ्यांतून पाणी येणे अशी लक्षणे दिसल्यास अंगावर न काढता तात्काळ तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. लहान चुकांमुळे डोळ्यांना गंभीर धोका निर्माण होऊ शकतो.” – डॉ. महेश ठिकेकर, नेत्र रुग्णालय, पिंपरी-चिंचवड मनपा