Pavana River Pollution: पिंपळे निलखमध्ये नदीपात्रात शेकडो मासे मृत! दूषित पाणी सोडणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी
Pavana River Pollution: पिंपळे निलख येथील इंगवले चौकाजवळ नदीपात्रात शेकडो मासे मृत अवस्थेत आढळले; प्रक्रिया न केलेले रसायनयुक्त विषारी पाणी सोडल्याचा संशय.

Pavana River Pollution – पिंपळे निलख येथील इंगवले चौक परिसरातील नदीच्या घाटावर मोठ्या प्रमाणावर मासे मृत पावल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. भर पावसाळ्यात नदीपात्रात दूषित आणि रसायनयुक्त पाणी सोडून जलचरांचा बळी घेणाऱ्यांचा प्रशासन कधी शोध घेणार? असा संतप्त सवाल आम आदमी (आप) पार्टीचे युवक आघाडी प्रदेशाध्यक्ष रविराज काळे यांनी उपस्थित केला आहे.
पावसाळ्याचे दिवस असताना नदीमध्ये पाण्याचा प्रवाह मोठा असतो, अशा परिस्थितीतही इतक्या मोठ्या संख्येने मासे मृत पावून पाण्यावर तरंगताना दिसणे ही अत्यंत चिंताजनक बाब आहे. परिसरातील काही बेकायदेशीर कारखाने, व्यावसायिक अथवा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांमधून प्रक्रिया न केलेले रसायनयुक्त विषारी पाणी थेट नदीपात्रात सोडले जात असल्याचा दाट संशय आहे.
या दूषित पाण्यामुळे नदीतील प्राणवायूचे प्रमाण झपाट्याने घटले असून, यामुळेच या निष्पाप जलचरांचा तडफडून मृत्यू झाला आहे. या गंभीर प्रकारामुळे केवळ जलचरांचेच नुकसान झालेले नाही, तर संपूर्ण इंगवले चौक व नदीकाठच्या परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली आहे. यामुळे स्थानिक नागरिक, ज्येष्ठ नागरिक आणि बालकांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण झाला आहे.
प्रशासनाच्या सुस्त कारभारामुळे आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या दुर्लक्षामुळेच प्रदूषणकर्त्यांचे धाडस वाढले असल्याचा आरोप रविराज काळे यांनी केला आहे. महापालिका पर्यावरण विभाग आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन नदीच्या दूषित पाण्याचे नमुने तात्काळ प्रयोगशाळेत तपासावेत.
नदीत विषारी रसायने आणि प्रक्रिया न केलेले पाणी सोडणाऱ्या संबंधित कारखानदार आणि दोषींचा शोध घेऊन त्यांच्यावर पर्यावरण संरक्षण कायद्यांतर्गत कठोर कारवाई व गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी काळे यांनी केली आहे.
“नद्या आपल्या जीवनवाहिन्या आहेत, परंतु प्रशासकीय उदासीनतेमुळे शहरातल्या नद्यांचे रूपांतर नाल्यांमध्ये होत आहे. जर पिंपरी-चिंचवड महापालिका आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली नाही आणि दोषींवर कडक कारवाई केली नाही, तर आम आदमी पार्टीच्या वतीने पालिका भवनवर तीव्र जनआंदोलन छेडले जाईल.”
– रविराज काळे, प्रदेशाध्यक्ष, युवक आघाडी, आप






