“पाकिस्तान बांगलादेशच्या लोकांसोबत एकजुटीने उभा आहे”, शेख हसीनांच्या राजीनाम्यानंतर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया…

इस्लामाबाद – शेख हसीना यांच्या राजीनाम्यानंतर राजकीय पेचप्रसंग निर्माण झालेल्या बांगलादेशातील परिस्थितीवर पाकिस्तानने पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
बुधवारी पाकिस्तानने बांगलादेशच्या लोकांशी एकजूट दाखवली. पाकिस्तानने म्हटले आहे की आम्हाला आशा आहे की देश (बांगलादेश) लवकरच सामान्य स्थितीत येईल. पाकिस्तान बांगलादेशच्या लोकांसोबत एकजुटीने उभा आहे.
🔊: PR NO. 1️⃣4️⃣4️⃣/2️⃣0️⃣2️⃣4️⃣
Pakistan Stands in Solidarity with the People of Bangladesh
🔗⬇️https://t.co/ysxug2hQgl pic.twitter.com/NrkproVTwN
— Ministry of Foreign Affairs – Pakistan (@ForeignOfficePk) August 7, 2024
बांगलादेशातील सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षणाबाबत विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनांमुळे शेख हसीना यांना पंतप्रधानपदाचा राजीनामा द्यावा लागला आणि भारतात पळून जावे लागले.
शेख हसिना यांना सत्तेवरून हटवून लष्कराने सत्ता ताब्यात घेतली असून हिंसाचारातील मृतांची संख्या 440 झाली आहे. आंदोलकांनी मंदिरांवरही हल्ले केले.
राष्ट्रपती मोहम्मद शहाबुद्दीन यांनी मंगळवारी संसद विसर्जित केली आणि 84 वर्षीय नोबेल पारितोषिक विजेते मोहम्मद युनूस यांची आगामी अंतरिम सरकारच्या प्रमुखपदी नियुक्ती केली.
“पाकिस्तानचे सरकार आणि लोक बांगलादेशच्या लोकांसोबत एकजुटीने उभे आहेत आणि शांततापूर्ण आणि लवकर सामान्य स्थितीत परत येण्यासाठी प्रामाणिकपणे उत्सुक आहेत,” असे परराष्ट्र कार्यालयाने बांगलादेशातील अलीकडील राजकीय परिवर्तनावर एका संक्षिप्त निवेदनात म्हटले आहे.
बांगलादेशला १९७१ मध्ये पाकिस्तानपासून स्वातंत्र्य मिळाले. हसीना यांचे वडील शेख मुजीबुर रहमान यांनी भारताच्या मदतीने बांगलादेशच्या निर्मितीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली होती.
आंदोलनाचे रुपांतर हिंसाचारात –
बांगलादेशमध्ये नोकऱ्यांमधील आरक्षणाविरोधातील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचे रूपांतर शेख हसीनाविरोधी आंदोलनात झाले होते. शेख हसीना यांनी आंदोलन थांबवण्यासाठी बळाचा वापर केला, ज्यामुळे आंदोलन भडकले. रविवारी उसळलेल्या हिंसाचारानंतर विद्यार्थ्यांनी सोमवारी ढाका मोर्चाची हाक दिली.
ढाका शहरातील वाढत्या संख्येनंतर लष्करानेही शेख हसीनाला मदत करण्यास नकार दिला. यानंतर शेख हसीना यांनी सोमवारी दुपारी राजीनामा दिला आणि लष्कराच्या विमानातून देश सोडून भारतात आल्या.
बांगलादेशच्या राष्ट्रपतींनी मंगळवारी संध्याकाळी नवीन अंतरिम सरकारची घोषणा केली. नोबेल पारितोषिक विजेते मोहम्मद युनूस यांना अंतरिम सरकारचे प्रमुख बनवण्यात आले आहे. उर्वरित सदस्यांची घोषणा नंतर केली जाईल.





