Bangladesh Crisis : “खोट्या बातम्या दिल्या तर…”, बांगालादेशातील हंगामी सरकारने माध्यमांना दिला इशारा

Bangladesh interim govt warns media :- बांगलादेशातील सत्तांतर आणि आंदोलनाबाबत खोट्या आणि दिशाभूल करणारे वार्तांकन करणाऱ्या माध्यमांना हंगामी सरकारने कडक कारवाईचा इशारा दिला आहे. देशातील परिस्थितीबाबत खोटे आणि दिशाभूल करणारे वार्तांकन केल्यास अशी वर्तमानपत्रे किंवा वृत्तवाहिन्या बंद केल्या जातील, अशी तंबीच हंगामी सरकारने दिली आहे.
जेंव्हा माध्यमे सत्याची बाजू घेत नाहीत, तेंव्हा संपूर्ण देशच डगमगतो, असे त्यांनी हंगामी सरकारमधील गृह खात्याचे सल्लागार, ब्रिगेडियर जनरल (निवृत्त) एम सखावत हुसेन यांनी म्हटले आहे. राजाबाग सेंट्रल पोलीस रुग्णालयात जखमी पोलिसांची भेट घेण्यासाठी गेले असताना ते बोलत होते.
माध्यमांकडून खऱ्या बातम्या दिल्या जात नसल्याबद्दल हुसैन यांनी नाराजी व्यक्त केली. जेंव्हा माध्यमे खऱ्या बातम्या देत नाहीत, तेंव्हा देशाची स्थिती बिघडते. जर बांगलादेशातील माध्यमांनी खऱ्या बातम्या दिल्या असत्या, तर पोलिसांबाबत सध्या उद्भवलेली परिस्थिती टाळता येऊ शकली असती, असेही ते म्हणाले.
विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान किमान ४० पोलीस कर्मचारी मारले गेले आणि ५०० हून अधिक पोलीस कर्मचारी जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचे नवनियुक्त पोलीस महानिरीक्षक मोहम्मद मैनुल इस्लाम यांनी म्हटले आहे. पोलिसांवर हल्ले झाल्यामुळे देशभरातील पोलीस कर्मचारी सेवेपासून लांब राहिले आहेत. सत्तांतर झाल्यानंतर पोलीस कर्मचारी पुन्हा हळूहळू रुजूब व्हायला लागले आहेत. मात्र ते प्रमाण अत्यल्प आहे. वाहतूक व्यवस्था सांभाळण्यासाठी देशातील स्काऊट विद्यार्थी पुढे सरसावले आहेत. राजधानी ढाक्यातील पोलीस मुख्यालयात देखील पोलीस कर्मचारी उपस्थित नसल्याचे चित्र आज बघायला मिळत होते.
Bangladesh Crisis : यूके ते यूएसए…! बांगलादेशात हिंदूंवरील हल्ल्याचे आंतरराष्ट्रीय पडसाद…
इंटरनेट खंडीत करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई होणार…
विद्यार्थी संघटनांच्या आंदोलनाच्या काळात देशातील इंटरनेट सेवा खंडीत करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असे बंदर, दूरसंचार आणि माहीती तंत्रज्ञान खात्याचे सल्लागार नाहिद इस्लाम यांनी म्हटले आहे. इंटरनेट हा हक्क आहे आणि इंटरनेट सेवा खंडीत करणे हे मानवाधिकारांचे उल्लंघन आहे. ही सेवा खंडीत करणाऱ्या अधिकाऱ्यांना परिणाम भोगावे लागतील, असेही ते म्हणाले.





