Rajnath Singh : “पाकिस्तानला दहशतवादाची किंमत मोजावी लागेल” – राजनाथ सिंह

Rajnath Singh – पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीर एक दिवस भारताचा भाग असेल. पाकिस्तानसोबतचा एकमेव मुद्दा दहशतवाद आणि पाकव्याप्त काश्मीरचाच असेल. पीओकेमधले लोक आपले आहेत. ते नागरिकच स्वतः एक दिवस सांगतील की, आम्ही भारताचा भाग आहोत. उरला दहशतवादाचा प्रश्न.
आता भारत कोणत्याही पातळीवरचा दहशतवाद अजिबात सहन करणार नाही. प्रत्येक कटाला योग्य उत्तर दिले जाईल, असे स्पष्ट प्रतिपादन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केले आहे. भारतीय उद्योग महासंघ (सीआयआय) च्या वार्षिक व्यापार शिखर परिषदेत राजनाथ सिंह बोलत होते.
राजनाथ सिंह म्हणाले की, जगभरात अनिश्चिततेचे वातावरण आहे. सर्वत्र संघर्ष आहे. याचे मुख्य कारण म्हणजे विश्वासाचा अभाव. आता ‘ऑपरेशन सिंदूर‘मध्ये संपूर्ण देशातील लोकांनी मेक इन इंडिया मोहिमेचे यश पाहिले, समजून घेतले आणि अनुभवले आहे. आज हे सिद्ध झाले आहे की, मेक इन इंडिया भारताच्या सुरक्षिततेसाठी आणि समृद्धीसाठी महत्त्वाचे आहे. मेक इन इंडिया हा भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेचा एक आवश्यक घटक आहे. जर आपल्याकडे ही क्षमता नसती, तर भारताचे सैन्य पाकिस्तानपासून पीओकेपर्यंत दहशतवादाविरुद्ध इतकी प्रभावी कारवाई करू शकले नसते.
राजनाथ सिंह म्हणाले, दहशतवादाचा व्यवसाय चालवणे किफायतशीर नाही. आज पाकिस्तानला याची जाणीव झाली आहे की, त्याला दहशतवादाची मोठी किंमत मोजावी लागेल. आम्ही भारताची रणनीती आणि दहशतवादाविरुद्धची प्रतिक्रिया दोन्ही बदलली आहेत. आम्ही पाकिस्तानशी असलेल्या आमच्या संबंधांची आणि चर्चेची व्याप्ती पुन्हा परिभाषित केली आहे.
आता जेव्हा जेव्हा चर्चा होईल तेव्हा ती फक्त दहशतवाद आणि पीओकेवरच असेल. पाकव्याप्त काश्मीर (पीओके) मधील लोक आमच्या कुटुंबाचा भाग आहेत. आम्ही ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ या संकल्पासाठी वचनबद्ध आहोत. आज भौगोलिक आणि राजकीयदृष्ट्या आमच्यापासून वेगळे झालेले आमचे भाऊ देखील कधीतरी भारताच्या मुख्य प्रवाहात परत येतील.
राजनाथ सिंह असेही म्हणाले की, पीओकेमध्ये राहणाऱ्या बहुतेक लोकांना भारताशी खोलवरचे नाते वाटते. असे काही लोक आहेत ज्यांना दिशाभूल करण्यात आली आहे. पीओकेमध्ये राहणाऱ्या आमच्या भावांची स्थिती शूर योद्धा महाराणा प्रताप यांचे धाकटे भाऊ शक्ती सिंहसारखी आहे.
भारत नेहमीच हृदये जोडण्याबद्दल बोलतो आणि आमचा असा विश्वास आहे की प्रेम, एकता आणि सत्याच्या मार्गावर चालत राहून, तो दिवस दूर नाही जेव्हा आपला स्वतःचा भाग पीओके परत येईल आणि म्हणेल की, मीच भारत आहे. पीओकेचे भारतात एकीकरण या देशाच्या सांस्कृतिक, सामाजिक आणि आर्थिक समृद्धीवर अवलंबून आहे.





