Flag Hoisting : ‘असाही’ आमचा स्वातंत्र्यदिन! विद्यार्थ्यांवर पाण्यात उभे राहून ध्वजारोहण करण्याची वेळ…
Flag Hoisting : जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह

Flag Hoisting : देशाच्या ८०व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करण्यात आले. याशिवाय देशभरात मोठ्या उत्साहात स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला. अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
परंतु अलिबाग तालुक्यातील धाकटे शहापूर येथील जिल्हा परिषद शाळेतील ध्वजवंदनादरम्यानचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या शाळेतील विद्यार्थ्यांना, शिक्षकांना अक्षरश: पाण्यात उभे राहून ध्वजारोहण करण्याची वेळ आली.
स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी तिरंग्याला अभिमानाने सलाम करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पायाशी पाणी साचल्याचे चित्र पाहायला मिळाल्याने अनेक प्रश्न निर्माण होत आहे. धाकटे शहापूर येथील जिल्हा परिषद शाळेच्या परिसरात पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात साचल्याने स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांना पाण्यातच उभे राहावे लागले.
विद्यार्थ्यांच्या पायाखाली चिखल आणि पाणीच पाणी …
तिरंग्याला सलाम करताना विद्यार्थ्यांच्या पायाखाली चिखल आणि पाणी असल्याचे व्हिडिओत दिसून येत आहे. यावरून जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. यामुळे अनुचित घटना घडण्याची शक्यताही नाकारता येत नाही. मात्र अनेक वर्ष शाळेची अवस्था ‘जैसे थी’ अशीच आहे. Flag Hoisting
शाळेच्या परिसरात पावसाच्या पाण्याचा नैसर्गिक निचरा होण्यासाठी असलेली जागा अडवण्यात आल्याने ही समस्या निर्माण होत असल्याचे स्थानिकांकडून सांगितले जात आहे. गेल्या २५ वर्षांपासून ही समस्या कायम असल्याचे सांगण्यात येत आहे. दरवर्षी पावसाळा सुरू झाला की विद्यार्थ्यांना साचलेल्या पाण्यातून शाळेत यावं लागते.
ही परिस्थिती नेहमी होत असतानाही यावर अद्याप कोणत्याही तोडगा काढला जात नसल्याने जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
दरम्यान, एखादा प्रश्न सोडवण्यासाठी तेथील घटना व्हायरल झाल्यानंतरच प्रशासनाला जागा येते का? या विद्यार्थांची स्थिती पाहून प्रशासन आता तरी यावर उपाययोजना करणार का? हा देखील प्रश्न अद्याप कायम आहे. Flag Hoisting
हेही वाचा :






