Yogesh Kadam : मनसेमुळे आमचे १० आमदार पडले ; ‘या’ नेत्याने केला दावा, शिवसेना मनसेत जुंपण्याची शक्यता

राज्यात विधानसभेची निवडणूक पार पडली. या निवडणुकीत महायुतीला मतदारांनी मॅनडेट दिला. याच्या जोरावर महायुतीमधील भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तिन्ही पक्षांनी मिळवून सरकार स्थापन केले. युतीमधील मोठा भाऊ भाजप ठरला आणि तब्बल १३२ जागा या पक्षाला मिळाल्या. तर शिवसेना ५७ आणि राष्ट्रवादी ४१ अशा एकूण २३० जागा मिळवत राज्यात महायुतीचे सरकार आले. अशातच शिवसेनेचे मंत्री योगेश कदम यांनी मोठा दावा केला आहे. विधानसभा निवडणुकीत मनसेने मते खाल्ल्यामुळे त्यांच्या पक्षाचे दहा उमेदवार पराभूत झाल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्यामुळे शिवसेना आणि मनसेत जुंपण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
नेमकं काय म्हणाले मंत्री योगेश कदम
धनुष्यबाण या चिन्हावर निवडून आलेले ५७ उमेदवार आणि आम्हाला पाठिंबा असलेले ३ अपक्ष असे मिळून ६० आमदार आहेत. विधानसभा निवडणुकीत १० आमदार मनसेमुळे पडले आहेत. गणित आणि आकडेवारी बघितली तर १० उमेदवार आहेत जे मनसेने जेवढी मते खाल्ली त्यापेक्षा कमी मतांनी पराभूत झाले. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत याची पुनरावृत्ती होऊ नये. यामुळे मुंबईत पुन्हा महायुती निवडून येण्यासाठी राज ठाकरे यांनी सोबत येण्याचा निर्णय घ्यावा, अशी विनंती करत असल्याचे कदम म्हणाले.
मनसेच्या वाट्याला भोपळा
गेल्या काही महिन्यांपूर्वी राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा एकही उमेदवार निवडून आला नाही. तसेच २०१९ मध्ये मनसेचा एकमेव आमदार राजू पाटील यांच्या वाट्याला यंदाच्या निवडणुकीत पराभव आला. राज ठाकरे यांनी राज्यात विविध ठिकाणी प्रचार सभा घेतल्या होत्या. पण विधानसभा निवडणुकीत मनसेच्या वाट्याला भोपळा आल्याचे पाहिला मिळाले.





