मुबंई – पक्षाची पुढील निवडणुकीत एकहाती सत्ता येऊ शकते पण राष्ट्रवादीचा विरोधक हा पक्षांतर्गत गटबाजी हाच आहे. त्यामुळे अजित पवार आणि जयंत पाटील यांनी मिळून राज्याचा दौरा करावा. याद्वारे पक्षाची एकहाती सत्ता येण्यापासून कोणी रोखू शकणार नाही आणि 2024 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस हा नंबर एकचा पक्ष होईल, अशी खात्री खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली.
मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे मंगळवारी(दि.12) झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आढावा बैठकीत सुप्रिया सुळे यांनी उपस्थितांशी संवाद साधला. त्यावेळी त्या बोलत होत्या.
पुढे सुप्रिया सुळे म्हणाल्या की, सत्ता गेली याचे नैराश्य जास्त नाही कारण शरद पवार यांच्या कारकिर्दीचा 55 वर्षांचा इतिहास पाहिला तर यातील 25 वर्षे ही सत्तेत होती आणि 30 वर्षे ही विरोधात होती. त्यातही प्रसिद्धी ही विरोधी पक्षात असताना अधिक झाली आहे. महाराष्ट्राने शरद पवार यांना विरोधात असतानाही प्रेम दिलं आहे, असे खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या.
पुढे सुप्रिया सुळे म्हणाल्या की, 2014 साली लोकांनी नापसंती दर्शवली आणि आपण हरलो. अनेक लोक आपल्याला सोडून गेले. सध्या सत्ताधाऱ्यांमध्ये 105 पैकी 50 त्यांचे आहेत आणि बाकी सगळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षातील आहेत. त्यामुळे त्यांची ताकद खूप वाढली आहे असे नाही. एका सर्वेक्षणानुसार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला 12 आणि काँग्रेस पक्षाला 08 अशा मिळून 20 जागा मिळणार होत्या. मात्र शरद पवार यांनी 2019 च्या निवडणुकीत आपल्या भाषणाची शैली बदलली आणि ही संख्या 54 वर गेली. संपूर्ण महाराष्ट्र शरद पवार यांच्या मागे उभा राहिला. राज्यातील युवकाने त्यांच्यावर विश्वास ठेवला, असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.
आज यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आढावा बैठकीत खा. सुप्रियाताई सुळे यांनी उपस्थितांशी संवाद साधला. @supriya_sule #NCP pic.twitter.com/AwUGnjILRO
— NCP (@NCPspeaks) July 12, 2022
आता सत्ता गेल्यानंतर शरद पवार यांना विचारलं पुढे काय तर ते म्हणाले की, उद्यापासून मी गाडी काढणार आणि राज्यातील शेवटच्या युवकापर्यंत जाणार आणि पक्षाला पुन्हा उभारी देणार. आपण घेतलेल्या निर्णयावर ठाम राहायचे हे शरद पवार यांनी सांगितले आहे. ज्याप्रमाणे या बैठकीत पदाधिकाऱ्यांनी विचार मांडले त्यावरून 2019 ची परिस्थिती आजही आहे असे वाटत नसल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
शून्यातून पुन्हा उभे राहू आणि पूर्ण ताकदीने पक्ष संघटना उभी करू. कितीही मोठी ताकद आली तरी महाराष्ट्र नेस्तनाबूत होऊ शकणार नाही असा विश्वास व्यक्त करत मंत्रिपद असताना आपल्या पक्षाच्या प्रत्येक नेत्याने प्रामाणिकपणे अभिमानास्पद काम केले असल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले.