Operation Tiger : ‘ऑपरेशन टायगर’ अन् ठाकरे गटात दुसऱ्यांदा फूट? बंडखोरी रोखण्यासाठी उद्धव ठाकरेंचा मास्टरस्ट्रोक
Operation Tiger:

Operation Tiger : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या राजकीय घडामोडींची चर्चा रंगली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील काही खासदार बंडाच्या तयारीत असल्याच्या चर्चांना वेग आला असून, या पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीत हालचाली वाढल्या आहेत
ठाकरे गटातील तब्बल ६ खासदार स्वतंत्र गट स्थापन करण्याच्या तयारीत असून, त्यानंतर हा गट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत विलीन होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र ही बंडखोरी रोखण्यासाठी ठाकरे गटाने मोठे पाऊल उचलले आहे.
पक्षामध्ये फूट पडू नये आणि पक्षाची संसदीय ओळख कायम राहण्यासाठी कायदेशीर मार्ग हाती घेतला आहे. ठाकरे गटाने थेट लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना हा एकच पक्ष आहे. संसदेत केवळ त्यांच्याच पक्षाला अधिकृत मान्यता देण्यात यावी, लोकसभेत कोणत्याही स्वतंत्र गटाला मान्यता देऊ नये अशी मागणी करण्यात आली आहे.
ठाकरे गटाची लोकसभा अध्यक्षांकडे नेमकी मागणी काय?
ठाकरे गटाचे ज्येष्ठ खासदार आणि संसदीय गटनेते अरविंद सावंत यांनी लोकसभा अध्यक्षांना हे अधिकृत पत्र सुपूर्द केले आहे. ज्यात लिहिले की, संसदेत केवळ शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या पक्षालाच मूळ आणि अधिकृत राजकीय पक्ष म्हणून मान्यता दिली जावी. पक्षातून बाहेर पडू पाहणाऱ्या कोणत्याही आमदारांच्या, खासदारांच्या किंवा स्वतंत्र गटाला कोणतीही वेगळी ओळख, विशेष दर्जा, सुविधा किंवा विशेषाधिकार मंजूर करण्यात येऊ नये.
तसेच जर भविष्यात एखादा गट किंवा खासदार वेगळ्या मान्यतेसाठी अध्यक्षांकडे गेला, तर ठाकरे गटाला आपली बाजू मांडण्याची संधी दिल्याशिवाय कोणताही एकतर्फी निर्णय घेतला जाऊ नये. पक्षांतर बंदी कायद्याच्या अंतर्गत उपलब्ध असलेल्या सर्व कायदेशीर पर्यायांचा वापर करण्याचा अधिकार पक्षाने स्वतःकडे राखून ठेवला आहे.
6 खासदार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या संपर्कात
ठाकरे गटाचे ७ खासदार सध्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना गटाच्या संपर्कात आहेत. हे खासदार लवकरच अधिकृतपणे शिंदे गटात प्रवेश करण्याची शक्यता आहे.
ज्यामध्ये संजय दिना पाटील, संजय देशमुख, नागेश पाटील आष्टीकर, ओमराजे निंबाळकर, भाऊसाहेब वाकचौरे आणि संजय जाधव यांचा समावेश आहे. हे खासदार सुरुवातीला संसदेत एक स्वतंत्र गट स्थापन करून नंतर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत विलीन होऊ शकतात, अशी चर्चा आहे.
मुंबईत या खासदारांचा भव्य प्रवेश सोहळा पार पडणार आहे. शिवसेना (शिंदे गट) पक्षाचा आगामी १९ जून रोजी वर्धापन दिन आहे. याच वर्धापन दिनाचे औचित्य साधून गोरेगाव येथील ‘नेस्को सेंटर’मध्ये या ६ खासदारांचा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत अधिकृत पक्षप्रवेश होणार असल्याचे वृत्त समोर येत आहे.
काय आहे ‘ऑपरेशन टायगर’?
खासदारांपाठोपाठ ठाकरे गटाचे काही आमदारही शिंदे गटाच्या संपर्कात असल्याची जोरदार चर्चा आहे. राजकीय वर्तुळात या संभाव्य पक्षांतराला ‘ऑपरेशन टायगर‘ असे नाव देण्यात आले आहे. या घडामोडींमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
परंतु यावर तोडगा काढण्यासाठी आणि आपले आमदार फुटण्यापासून रोखण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी २२ जून रोजी दुपारी ४:०० वाजता मुंबईतील ‘शिवालय’ या पक्ष कार्यालयात सर्व आमदारांची तातडीची बैठक बोलावली आहे.
एका खासदाराला १५ कोटींची ऑफर?
या राजकीय घडामोडींवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर पोस्ट करत अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. महाराष्ट्रातील खासदारांना कोट्यवधी रुपयांचे आमिष दाखवून फोडण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा दावा राऊत यांनी केला आहे.
संजय राऊत यांनी पोस्टमध्ये लिहिले की, “अपना सपना मनी मनी! हे अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक आहे. महाराष्ट्रातील खासदारांना पक्ष बदलण्यासाठी आज रात्री प्रत्येकी १५ कोटी रुपयांची आगाऊ (ॲडव्हान्स) रक्कम ऑफर केली जात असल्याची माहिती धक्कादायक आणि घृणास्पद आहे! ठाकरे गटाकडे सध्या लोकसभेत ९ खासदार आहेत. मात्र, ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चांमुळे महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा:






