Operation Tiger : आज संध्याकाळी 6 खासदार मुंबईत दाखल होणार; गोरेगावच्या ‘या’ प्रसिद्ध हॉटेलमध्ये राहणार
उद्या 19 जून रोजी गोरेगाव येथील नेस्को सेंटरमध्ये शिवसेना शिंदे गटाकडून पक्षाचा 60 वा वर्धापन दिन जोरदार स्वरूपात साजरा केला जाणार आहे.

Operation Tiger : राजकीय वर्तुळातून एक अत्यंत मोठी आणि धक्कादायक बातमी समोर येत आहे. शिवसेना ठाकरे गटाचे 6 खासदार फुटल्याचे वृत्त असून, हा उद्धव ठाकरे यांच्यासाठी अत्यंत मोठा धक्का मानला जात आहे.
या घडामोडींनंतर तातडीने या 6 खासदारांच्या सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आली असून, त्यांना केंद्र सरकारकडून ‘वाय प्लस’ (Y+) सुरक्षा पुरवण्यात आली आहे. ( Operation Tiger )
सुरक्षेचे कारण पुढे करत या सर्व खासदारांना दिल्लीतून अज्ञात स्थळी हलवण्यात आले होते, ज्यामुळे हे खासदार नेमके कुठे गेले? याबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण झाली होती. या सर्व खासदारांना सध्या राजस्थानमधील एका सुरक्षित ठिकाणी (रिसॉर्ट/जागेत) हलवण्यात आले आहे.
तसेच आज संध्याकाळी मुंबईत दाखल होणार आहेत. मुंबईतील गोरेगाव येथील वेस्टर्न एक्स्प्रेसवेला लागून असलेल्या प्रसिद्ध वेस्टीन हॉटेलमध्ये या सर्व खासदारांची मुक्कामाची सोय करण्यात आली आहे.
उद्या 19 जून रोजी गोरेगाव येथील नेस्को सेंटरमध्ये शिवसेना शिंदे गटाकडून पक्षाचा 60 वा वर्धापन दिन जोरदार स्वरूपात साजरा केला जाणार आहे.
हा नेस्को सेंटरचा कार्यक्रम आणि वेस्टीन हॉटेल अगदी शेजारी शेजारी असल्यामुळेच सुरक्षेच्या आणि जवळ असल्याच्या कारणास्तव सर्व खासदारांना आज संध्याकाळी 6 वाजेनंतर गोरेगावमध्ये आणले जाईल.
या सर्व बंडखोर खासदारांसाठी वेस्टीन हॉटेलमध्ये आधीच रूम बुक् करण्यात आल्या आहेत आणि आज रात्री ते याच हॉटेलमध्ये मुक्कामी असणार आहेत.
संजय राऊतांचा जोरदार हल्लाबोल !
बंडखोर खासदारांना आणि नेत्यांना दिलेल्या सुरक्षेवरूनही राऊतांनी सरकारवर निशाणा साधला. “जर तुमच्यात हिंमत आहे आणि तुम्हाला भीती नाही, तर मग तुमचे नगरसेवक ठाण्यात का लपवून ठेवता?
आमच्याकडे राडे करण्याची क्षमता नाही असं म्हणता, मग या खासदारांना वाय प्लस सुरक्षा, सीआरपीएफची सेक्युरिटी का दिली आहे? त्यांच्या घरावर आणि मालमत्तेवर एवढा कडक बंदोबस्त कशासाठी? प्रत्येक गद्दाराला सुरक्षा देण्याचे कारण काय?” असा सवाल राऊतांनी उपस्थित केला.
पुढे बोलताना ते म्हणाले, “गिरीश महाजन यांनी पोलिसांच्या गाड्या बाजूला ठेवून समोर यावे. राडेबाजीवर आम्हाला आव्हान देऊ नका. एकदा सुरक्षा काढून बघा, तुमच्या अंगावर चिंधीही राहणार नाही. तुमचे बॉस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः एवढी सुरक्षा घेऊन फिरतात, त्यांच्या चिरंजीवांकडेही (खासदार श्रीकांत शिंदे) मोठा सुरक्षा ताफा आहे.”
या संपूर्ण बंडखोरीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा प्रचंड खळबळ उडाली असून, आगामी काळात ठाकरे गट आणि सत्ताधारी महायुतीमधील संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे आहेत.






