नवी दिल्ली -भाजपच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी निवडणूक आयोगाकडे धाव घेतली. त्या भेटीत विधानसभा निवडणुकीवेळी पश्चिम बंगालमध्ये केवळ केंद्रीय सशस्त्र पोलीस दले तैनात करण्याचे साकडे घालण्यात आले. बंगालमध्ये एप्रिल-मेमध्ये विधानसभा निवडणूक अपेक्षित आहे. त्या निवडणुकीमुळे आतापासूनच राजकीय वातावरण तापू लागले आहे. अशातच भाजपचे ज्येष्ठ नेते भुपेंद्र यादव, प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष आणि काही खासदारांचा समावेश असणाऱ्या शिष्टमंडळाने निवडणूक आयोगाची भेट घेतली. त्यावेळी एक निवेदन सादर करून भाजपच्या विविध मागण्या मांडण्यात आल्या. निवडणूक मुक्त वातावरणात होण्यासाठी आणि त्या प्रकियेची प्रतिष्ठा जपण्यासाठी केंद्रीय दलांची सुरक्षा आवश्यक असल्याचे पक्षाकडून नमूद करण्यात आले. बंगालच्या पोलीस आणि प्रशासकीय यंत्रणांवर देखरेख ठेवण्याची जबाबदारी केंद्रीय निरीक्षकांकडे सोपवावी, असा आग्रहही भाजपने धरला आहे. बंगालमध्ये सत्तारूढ तृणमूल कॉंग्रेस आणि भाजपमध्ये जोरदार मुकाबला होईल, असे सध्याचे चित्र आहे. अर्थात, कॉंग्रेस आणि डाव्या पक्षांनी हातमिळवणी केल्याने त्यांची आघाडीही मोठे आव्हान उभे करण्याची शक्यता आहे.