माणिकडोह धरणात केवळ १० टक्के उपयुक्त पाणीसाठा

ग्रामस्थांना करोनासोबत पाण्याचीही चिंता
जुन्नर : माणिकडोह धरणातून सुरू असलेले उन्हाळी आवर्तन दहा दिवसांपूर्वी थांबले असून गुरुवारी सकाळी धरणात केवळ ९.९२ टक्के (१.०१ टीएमसी) उपयुक्त पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. येडगाव येथून श्रीगोंदा, पारनेरसाठी सुरू असलेले आवर्तन पुढील काही दिवस सुरू राहणार आहे. या ठिकाणी डिंभे धरणाच्या डाव्या कालव्यातून ५५० क्युसेक्सने पाणी येत आहे. मात्र आजमितीस या येडगाव पाणीसाठ्यात केवळ ०.५३ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे.
जुन्नर शहर व परिसरातील गावे पिण्याच्या पाण्यासाठी माणिकडोह धरणावर अवलंबून असल्यामुळे आता कुठल्याही परिस्थितीत हे शिल्लक पाणी यापुढे सोडू नये, अशी ग्रामस्थांची मागणी आहे. उन्हाळ्याच्या झळा वाढत असून साठ्यातील बाष्पीभवनही या दिवसांत अधिक वेगाने होत असते. त्यामुळे यंदा जर पावसाने दगा दिला तर पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
-कुकडी प्रकल्पातील धरणांतील गुरुवारचा उपयुक्तसाठा-
टीएमसी व टक्केवारी-
माणिकडोह – १.०१ / ९.९२%
वडज – ०.३६ / ३०.७५%
पिंपळगाव जोगा – ०.३८ / ९.९२%
डिंभे – ६.०१ / ४८.१२%
चिल्हेवाडी- ०.४६ / ५७.६१%




