onion price hike: साखरेनंतर आता कांद्यानेही रडवलं! दरात अचानक मोठी वाढ
onion price hike: सणासुदीच्या दिवसांपूर्वी साखरेच्या किमती वाढत असून त्यामुळे राजकीय वाद निर्माण होत असतानाच, कांद्याच्या किमतीही त्याच मार्गावर जात आहेत,

onion price hike: सणासुदीच्या दिवसांपूर्वी साखरेच्या किमती वाढत असून त्यामुळे राजकीय वाद निर्माण होत असतानाच, कांद्याच्या किमतीही त्याच मार्गावर जात आहेत, ज्यामुळे कांदा देखील सर्वसामान्यांना रडवताना दिसत आहे. कारण कांद्याच्या किमती अचानक वाढल्या आहेत. कांद्याचा किरकोळ भाव प्रति किलो ३०-३५ रुपयांवरून वाढून ६०-६५ रुपयांवर पोहोचला आहे.
अनेक शहरांमध्ये कांदे महाग onion price hike:
बटाटे, कांदे आणि टोमॅटो या स्वयंपाकघरात रोज वापरल्या जाणाऱ्या सामान्य भाज्या आहेत आणि त्यांच्या भाववाढीमुळे स्वयंपाकघराच्या बजेटमध्ये अडथळा येऊ शकतो. हे सध्या दिसून येत आहे. अहवालानुसार, कांद्याच्या किमतींचा फटका दिल्ली-एनसीआर, नाशिक ते चेन्नईपर्यंतच्या भागांना बसला आहे. ग्राहक व्यवहार विभागाच्या मते, कांद्याचा सरासरी किरकोळ भाव प्रति किलो सुमारे ४२ रुपये आहे, जो महिन्याभरापूर्वीच्या तुलनेत १९-२० टक्क्यांनी वाढला आहे.
दिल्ली-एनसीआरमधील भाजी मार्केटमध्ये कांदे ६०-६५ रुपये प्रति किलो दराने उपलब्ध आहेत. नाशिकमध्ये अवघ्या एका महिन्यात कांद्याच्या दरात ७० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. कांद्याच्या दरात झालेल्या या अचानक वाढीला प्रतिसाद म्हणून, ज्या शहरांमध्ये तुटवड्यामुळे दरात मोठी वाढ झाली आहे, तिथे पुरवठा करण्यासाठी सरकार आपल्या बफर स्टॉकमधून कांदा सोडण्याची तयारी करत आहे.

मात्र , देशातील कांद्याचे उत्पादन जवळपास गेल्या वर्षीच्या पातळीइतकेच आहे आणि येत्या काही महिन्यांत देशांतर्गत मागणी पूर्ण करण्यासाठी पुरेसा साठा उपलब्ध आहे, असे सरकारचे म्हणणे आहे. हवामान आणि पुरवठा साखळीच्या परिस्थितीमुळे ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये कांद्याच्या दरात सामान्यतः वाढ होते, असे सरकारने स्पष्ट केले.
साखरेमुळे सणासुदीच्या उत्साहावर विरजण
कांद्याच्या दरातील ही मोठी वाढ अशा वेळी झाली आहे, जेव्हा साखरेच्या दरांनी आधीच सणासुदीच्या उत्साहावर विरजण घातले आहे. देशात साखरेच्या दरात मोठी वाढ झाली असून, काही दिवसांतच किरकोळ बाजारातील भाव ६५ रुपये प्रति किलो किंवा त्याहून अधिक झाला आहे. एका महिन्यात दरात सुमारे १५ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
साखरेवरून राजकीय गदारोळ onion price hike:
भारताच्या राजकीय वर्तुळात साखरेच्या दरांवरून जोरदार चर्चा सुरू आहे. इथेनॉल उत्पादनासाठी उसाच्या वापरामुळे देशातील साखरेचा पुरवठा कमी होत असून त्यामुळे साखरेच्या दरात वाढ होत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. या आरोपांमुळे सरकारला लक्ष्य करण्यासाठी एक मोठा मुद्दा मिळाला आहे. तथापि, केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने हे आरोप फेटाळून लावले असून, देशात साखरेची कोणतीही कमतरता नाही आणि दरवाढीचे कारण इथेनॉल नाही, असे म्हटले आहे.
इंडियन शुगर मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे अध्यक्ष नीरज शिरगावकर यांनीही म्हटले आहे की, भारतात साखरेची कोणतीही कमतरता नाही; सध्याचा साठा पुरेसा आहे. अल्पकालीन बाजारभावाबाबतच्या चिंता दूर केल्या जातील. हवामानामुळे उसाचे उत्पादन कमी होणे, महाराष्ट्रातील गाळपाचे दर वाढणे आणि उत्तर प्रदेशातील वाणांच्या समस्यांमुळे साखरेच्या दरात वाढ झाली आहे. सणासुदीच्या हंगामामुळेही मागणी वाढत आहे.





