नाशिक: करोना संकटातही नाशिकमधील कांदा रेल्वेने थेट बांगलादेशला पाठवण्यात आला. रेल्वेला या भाड्यापोटी तब्बल 22 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आणि व्यापारीही मालामाल झाले. मात्र,ज्यांनी हा कांदा पिकवला त्या शेतकऱ्याला तुटपुंजा भाव मिळाला.
करोनाचा प्रादुर्भाव असतानाही बांगलादेशातून मोठ्या प्रमाणात कांद्याची मागणी वाढली. एक लाख मेट्रिक टनाहून अधिक कांदा रेल्वेच्यामाध्यमातून बांगलादेशात निर्यात करण्यात आला. यातून रेल्वेला कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न मिळाले.
यंदा उन्हाळ्यात कांद्याचे उत्पादन 130 टक्के झाले. त्यातच करोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे देशासह जागतिक बाजारपेठेत कांद्याची मागणी घसरली. कांद्याचे बाजारभाव एक हजार रुपयांच्या आत येत सरासरी 500 ते 600 रुपये इतका प्रतिक्विंटलला बाजारभाव मिळत असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आणि कांदा उत्पादकाला आपला कांदा हा तोट्यात विक्री करण्याची वेळ आली.
त्यातचबांगलादेशातून वाढलेल्या मागणीमुळे नाशिक जिल्ह्यातील लासलगाव, मनमाड, निफाड, खेरवाडी आणि नाशिक रोड या रेल्वे स्थानकाच्या मालधक्क्यावर 55 मालगाड्यांमधून कांदा आत्तापर्यंत बांगलादेशाला
पाठवण्यात आला.
यातून रेल्वेला एका मालगाडी मागे 40 लाख रुपये इतके भाडे मिळाले यातून 55 मालगाड्यांच्या मागे 22 कोटींचे उत्पन्न मिळाले. तर कांदा व्यापाऱ्याला नफा मिळाला. मात्र, चार महिने शेतकऱ्यांने कांदापोटाच्या मुलासारखा जगविला आणि तो बाजारात विक्री केला, तर त्याला चारशे ते पाचशे रुपये प्रति क्विंटल मागे तोटा झाला. याकडे केंद्र सरकार लक्ष देणार का, हा सवाल कांदा उत्पादकांनी उपस्थित केलाआहे.
विक्री झालेल्या आणि विक्री होणाऱ्या कांद्याला पाचशे रुपये अनुदान देण्याची मागणी शेतकरी करत आहेत.