पुणे – रेल्वे प्रवासादरम्यान आवश्यक असणारी मदत आणि प्रवास करताना आलेल्या तक्रारी आता प्रवाशांना दोनच क्रमांकाद्वारे प्रशासनापर्यंत पोहोचवता येणार आहेत. दि. 1 जानेवारी 2020 पासून रेल्वेचे 6 हेल्पलाइन क्रमांक बंद होणार असून, केवळ 182 आणि 139 हे क्रमांक सुरू राहणार आहेत, अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.
रेल्वे प्रवास करताना अनेक समस्या उद्भवतात. तर अनेकदा प्रशासनाच्या मदतीची आवश्यकता असते. दुर्घटना, सुरक्षितता, स्वच्छता आदींसह विविध सेवा, मदत आणि तक्रारींसंबंधी प्रवाशांना थेट प्रशासनाशी संपर्क साधता यावा, यासाठी हेल्पलाइन क्रमांक ठरवून दिले आहेत. मात्र, रेल्वेचे हेल्पलाइन क्रमांक माहिती नसल्याने प्रशासन आणि प्रवाशांचा संपर्क होऊ शकत नाही.
यासह रेल्वेचे 5 ते 6 वेगवेगळे हेल्पलाइन क्रमांक असल्याने प्रवाशांचा अनेकदा गोंधळ होतो. प्रवाशांकडून एकत्रित हेल्पलाइन क्रमांक सुरू ठेवण्याची मागणी प्रशासनाकडे करण्यात येत होती. या मागणीनुसार रेल्वे प्रशासनाने केवळ दोन हेल्पलाइन क्रमांक सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.