आता ती वेळ दूर नाही! लवकरच घोषणा? ठाकरे बंधूंंच्या युतीचा मार्ग मोकळा; ‘या’ नेत्यांवर विशेष जबाबदारी, हालचालींना वेग

Thackeray brothers alliance : महाराष्ट्रात आगमी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमुळे हालचालींना वेग आला आहे. दिवाळीनंतर या निवडणुका होणार असल्याचे संकेत मिळत असून, राजकीय पक्षांनी कंबर कसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. या निवडणुकीकडे मिनी विधानसभा म्हणून पाहिले जात आहे.
हे सगळं सुरू असताना दुसरीकडे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या मनोमिलनाच्या जोरदार चर्चा रंगल्या आहेत. दोन्ही बाजूने म्हणजेच उबाठा आणि मनसेच्या पर्यायाने राज आणि उद्धव यांच्या एकत्रीकरणाच्या सकात्मक चर्चा होत आहे. पण युतीची घोषणा होणार तरी कधी असा प्रश्न अवघ्या महाराष्ट्राला पडलेला आहे.
अशातच एकत्रीकरणाची मोठी अपडेट समोर आली असून, लवकरच युतीची घोषणा होणार असल्याची शक्यता आहे. स्थानिक पातळीवर जागावाटपाची चर्चा सुरू झाल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे लवकरच दोन्ही पक्षांकडून युतीची अधिकृत घोषणा केली जाणार असल्याचे सांगितले जात आहे. तत्पूर्वी जागावाटपाची सूत्र निश्चित करण्यावर भर दिला जात आहे. यासाठी दोन्ही पक्षातील नेत्यांवर मोठी जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
या नेत्यांवर विशेष जबाबदारी
मुंबईचा गड राखण्यासाठी जोरदार तयारी केली जात असून, उबाठा पक्षाच्या वतीने वरुण सरदेसाई, अनिल परब आणि सूरज चव्हाण यांच्यावर जागा वाटपाच्या चर्चेची जबाबदारी असल्याची माहिती आहे. तर विभागनिहाय जबाबदारीमध्ये ठाण्यात केदार दिघे, राजन विचारे, पुण्यात आदित्य शिरोडकर, वसंत मोरे यांच्यार जबाबदारी असेल. मनसेकडून बाळा नांदगावकर, संदीप देशपांडे, नितीन सरदेसाई आणि अविनाश अभ्यंकर यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
मनसे आणि उबाठासेना एकत्र येणार
ठाण्यातील काही प्रश्नांसदर्भात मनसे आणि उबाठासेना एकत्र येणार आहे. १३ अॅाक्टोबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या मोर्च्यात जोरदार शक्तीप्रदर्शन दोन्ही पक्षांकडून करण्यात येणार आहे.





