- एकापाठोपाठ एक संकट
- व्यापारी, उद्योजक हताश आणि हतबल
पिंपरी – प्रत्येकाच्या हाताला काम देणाऱ्या पिंपरी चिंचवड उद्योगनगरीची चक्रे करोनाच्या संकटामुळे पूर्णपणे थंडावली आहेत. नोटाबंदी, त्यापाठोपाठ आलेली आर्थिक मंदी, जीएसटी, रेरा आणि आता करोना अशी एकापाठोपाठ एक संकटे उद्योगनगरीवर गेल्या काही वर्षांत आली. त्यामुळे आधीच हवालदिल झालेले छोटे व्यापारी, मोठ्या उद्योजकांसह हातावर पोट असलेले कामगारही पूर्णपणे हताश झाल्याचे पहावयास मिळत आहे.
पिंपरी-चिंचवडच्या औद्योगिक नगरीला गेल्या दोन ते तीन वर्षांत चांगलीच घरघर लागली होती. काही प्रमाणात मंदी असतानाच नोटाबंदी करण्यात आली आणि त्यानंतर परिस्थितीच बदलली. अगोदरच्या मंदीत मोठी भर पडली.
सहा महिन्याच्या अंतराने औद्योगिक नगरी पुन्हा बाळसे धरू लागल्यानंतर जीएसटीचा फटका बसला. एका बाजूला औद्योगिक वसाहत या सगळ्या प्रकारामुळे खचली असतानाच “रेरा’चा कायदा आल्यामुळे बांधकाम व्यवसायही अडचणीत आला. लागोपाठ धक्के सहन करणाऱ्या आणि मंदीच्या गर्तेत अडकलेल्या “औद्योगिक नगरी’ला 2020 कडून मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र सध्या सुरू असलेल्या करोनामुळे सर्वजणच हताश झाले आहेत.
पंधरा वीस दिवसांच्या लॉकडाउननंतर जनजीवन सुरळीत होईल आणि उद्योग व्यवसाय सुरू होतील या अपेक्षेवर असलेल्या व्यवसायिकांच्या आशेवर पाणी फेरले गेले आणि लॉकडाउन तीन मेपर्यंत वाढविण्यात आल्याने हतबल झालेल्या व्यवसायिकांच्या अडचणीत आणखीनच भर पडली. पुढे काय होणार याचीच चिंता या उद्योग व व्यवसायिकांना सतावत आहे. तर या उद्योग, व्यवसायावर अवलंबून असणाऱ्यांची अवस्था अत्यंत दुर्देवी बनली आहे. सगळीकडेच हताश आणि हतबल असलेले अनेकजण पहावयास मिळत आहेत.
रात्रीची झोप उडाली आहे – वाधवानी
पिंपरी कॅम्पातील ग्रोसरी, विविध अँटिक पीसची विक्री करणारे विजय वाधवानी म्हणाले, माझे भाड्याने दुकान आहे. साठ हजार रुपये भाडे महिन्याकाठी मोजावे लागते. सहा कामगार आहेत त्यांचे पगार यांची आकडेमोड करावी लागते. मात्र गेल्या महिन्याभरापासून सगळेच ठप्प झाले आहे. त्यातच बॅंकेचे हप्ते, जीएसटीचे भूत मानगुटीवर बसलेले आहे. या सगळ्यांची जुळवा जुळव कशी करायची या विचाराने रात्रीची झोप उडाली आहे . खर्च खूप आणि उत्पन्न् काहीच नाही, असे या महिन्यात झाले असून यातून सावरणे कठीण होऊन बसले आहे व्यवसाय ठप्प असल्याने कर्जाचा बोजा वाढत चालला आहे.
पर्यटन व्यवसायाला सावरणे कठीण- चौधरी
पिंपरीतील वन वर्ल्ड ट्रॅव्हल कम्पनीचे जयेश चौधरी म्हणाले, मार्च ते जून हा ट्रॅव्हल कंपन्यांचा सिझन कालावधी असतो. मात्र या काळात झालेले लॉकडाऊनमुळे एकही बुकिंग आलेले नाही. पूर्वी झालेले बुकींग रद्द करावे लागले. मात्र या बुकींगचे पैसे परत द्यायला विमान कंपन्या तयार नाहीत. लॉकडाऊन संपल्यानंतर बुकींग करा, असे सांगितले जात आहे. मात्र दुसरीकडे बुकींग करणारे ग्राहक वारंवार पैसे परत देण्याचा तगादा लावत आहेत. साहजिक इतर देशांची अवस्था आता अतिशय बिकट झालेली असल्याने नागरिक धास्तावलेले आहेत. त्यामुळे पुढील वर्षभर पर्यटन व्यवसायाला सावरणे कठीण आहे.
- आर्थिक घडी पूर्णपणे विस्कटणार- चांदवाणी
पिंपरी कॅम्पातील व्यवसायिक राजेश चांदवाणी म्हणाले, लॉकडाऊन वाढविल्याने 14 एप्रिलनंतर काही प्रमाणात व्यवसाय सुरळीत होण्याची शक्यताही मावळल्याने आता 3 मे पर्यंत वाट पाहण्याची वेळ आली आहे. माझे पिंपरी कॅम्प येथे मोबाईल रिपेरिंगचे दुकान आहे. दुकान भाडेतत्वावर असल्याने महिन्याचे भाडे द्यावेच लागणार आहे. दोन महिने दुकान बंद राहणार असल्यामुळे आर्थिक घडी पूर्णपणे विस्कटणार आहे. लॉकडाऊनचा कालावधी संपल्यानंतरही लगेचच सगळे सुरळीत होणे अवघड आहे. खरी परीक्षा लॉकडाउनचा कालावधी संपल्यानंतर आहे. - व्यावसायिकांचे भवितव्य खडतर- मुळे
हॉटेल व्यावसायिक कैलास मुळे म्हणाले, भोसरी, इंद्रायणीनगर येथे आपला कट्टा नावाचे हॉटेल आहे. आता एक महिना होत आला तरी हॉटेल बंदच आहे. माझे हॉटेल भोसरी एमआयडीसी भागात आहे. येथे कामगारांची वर्दळ असते त्यामुळे हॉटेल व्यवस्थित सुरु होते. मात्र आता येथील कारखानदारीच अडचणीत आली असल्याने या भागातील हॉटेल व्यवसायिकांचे भवितव्य खडतर होणार आहे. हॉटेलसाठी घेतलेले कर्ज डोक्यावर आहे. त्यातच कामगार गावाला गेले आहेत. लॉकडाऊन कालावधी संपल्यानंतरही एमआयडीसीला उभारी घ्यायला वेळ लागेल.