IND vs AUS : ‘विराटला फॉर्म लवकर परत मिळवायला हवा, नाही तर…’, रवी शास्त्रींनी किंग कोहलीला दिला महत्त्वाचा सल्ला

Ravi Shastri advice to Virat Kohli : भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने वनडे क्रिकेटमध्ये बऱ्याच कालावधीनंतर पुनरागमन केले आहे. मात्र, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सुरुवातीच्या दोन वनडे सामन्यांमध्ये त्याच्या बॅटमधून धावा निघाल्या नाहीत. दुसरीकडे, रोहित शर्माने दुसऱ्या सामन्यात ७३ धावांची शानदार खेळी करत टीकाकारांना प्रत्युत्तर दिले. तरीही, कोहलीच्या फॉर्मबाबत चिंता वाढत आहे. भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी कोहलीला लवकरात लवकर फॉर्ममध्ये परतण्याचा सल्ला दिला आहे. कारण व्हाइट-बॉल क्रिकेटमध्ये जागेसाठी तीव्र स्पर्धा असल्याचे त्यांनी नमूद केले.
व्हाइट-बॉल क्रिकेटमध्ये जागेसाठी प्रचंड स्पर्धा –
भारतीय संघाला या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले. कोहली दोन्ही सामन्यांमध्ये शून्य धावांवर बाद झाला. दुसऱ्या वनडेदरम्यान शास्त्री म्हणाले, “कोहलीने लवकरच आपला फॉर्म परत मिळवला पाहिजे. भारतात व्हाइट-बॉल क्रिकेटमध्ये जागेसाठी प्रचंड स्पर्धा आहे. मग तो विराट असो, रोहित असो वा कोणीही, कोणीही निश्चिंत राहू शकत नाही. आता गोष्टी इतक्या सोप्या राहिलेल्या नाहीत.”
त्याच्या पायांच्या हालचालींमध्ये थोडासा संकोच दिसला –
शास्त्री पुढे म्हणाले, “दुसऱ्या सामन्यातही तो (कोहली) चुकला. त्याच्या पायांच्या हालचालींमध्ये थोडासा संकोच दिसला, जो त्याच्यासाठी असामान्य आहे. वनडे क्रिकेटमधील त्याचा विक्रम अप्रतिम आहे, त्यामुळे सलग दोनदा शून्यावर बाद होणे त्याच्यासाठी निराशाजनक असेल.” भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांच्या मालिकेतील तिसरा आणि अंतिम वनडे सामना उद्या, शनिवारी, सिडनी क्रिकेट ग्राउंडवर खेळवला जाईल.
हेही वाचा – ZIM vs AFG : आयसीसीने अफगाणिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, पराभवानंतर केली मोठी कारवाई
सिडनीत भारताला सक्षम आव्हान उभे करण्यासाठी कोहलीला त्याची लय, टायमिंग आणि वर्चस्व परत मिळवावे लागेल. तसेच, शुबमन गिलने सलामीला चांगली सुरुवात करुन द्यावी लागेल. कारण पुढील फलंदाजांसाठी माहौल तयार करणे गरजेचे आहे. कोहली आणि रोहित सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये फक्त वनडे सामने खेळतात. त्यामुळे दोन्ही फलंदाजांना मालिकेच्या अंतिम सामन्यात उत्तम कामगिरी करून मालिकेचा सुखद अंत करायचा आहे.





