पाटणा – बिहारच्या राजकारणामध्ये आज मोठा भूकंप झाला आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पदाचा राजीनामा देत भाजपसोबतची युती तोडली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून राज्यामध्ये सत्ताधारी पक्षात असलेल्या भाजप व जेडीयूदरम्यान खटके उडत असल्याच्या बातम्या समोर येत होत्या. अशातच आज नितीश कुमार यांनी आज मोठा निर्णय घेत भाजपसोबत काडीमोड घेतला.
विधानसभा निवडणुकांमध्ये जेडीयू व भाजप एकत्र लढले होते. राज्यात मुख्यमंत्रीपद नितीश कुमार यांच्याकडील राहील असे निवडणुकांपूर्वीच ठरले होते. त्याप्रमाणेच जेडीयूला भाजपपेक्षा कमी जागा मिळून देखील नितीश कुमार यांना मुख्यमंत्री करण्यात आले होते. असं असलं तरी नितीश कुमार यांच्या मंत्रिमंडळामध्ये भाजपचा वरचष्मा असल्याचे पाहायला मिळाले. मंत्रिमंडळात भाजपचे वाढलेले वजन नितीश कुमार यांना खटकत असल्याच्या बातम्या देखील अनेकदा समोर आल्या.
अशातच, नितीश कुमार यांनी आज (मंगळवारी) पक्षाच्या नेत्यांसोबत बैठक घेतली. बैठकीमध्ये अनेक धक्कादायक बाबींवर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली. माजी केंद्रीय मंत्री आणि आता जनता दलातून बाहेर पडलेले नेते आरसीपी सिंह यांनी काही जणांशी संपर्क साधून पैशांची देवाण घेवाण करण्याबाबत चर्चा केली होती. तसेच त्यांनी हे सगळे भारतीय जनता पार्टीच्या इशाऱ्यावरून केले असल्याचे काही आमदारांनी नितीश यांच्यासमोर सांगितले.
आम्हाला प्रत्येकी 6 कोटी रूपयांची ऑफर देण्यात आली होती. भाजपने राज्यात आपल्याला केवळ अपमानित करण्याचेच काम केले. तसेच आपला पक्ष दुबळा करण्याचा प्रयत्न केला असा दावाही काही नेत्यांनी नितीश कुमार यांच्यासमोर केला. या बैठकीनंतर नितीश कुमार यांनी एनडीएमधून बाहेर पडत असल्याची घोषणा केली.
यानंतर सायंकाळी चारच्या सुमारास त्यांनी राज्याचे राज्यपाल फाघू चौहान यांची भेट घेत मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा सुपूर्द केला. यसोबाबतच नितीश कुमार यांनी राज्यातील भाजपसोबतची युती देखील तोडली आहे. महाराष्ट्रात झालेल्या महाविकास आघाडीच्या प्रयोगाप्रमाणे बिहारमध्ये देखील जेडीयू, राजद, काँग्रेस व डावे एकत्र येत सत्ता स्थापन करतील असा अंदाज राजकीय जाणकार वर्तवत आहेत.