Bihar Politics : देशाच्या राजकारणात मोठा उलटफेर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार ( Nitesh Kumar) यांना राज्यसभेवर पाठवण्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. या हालचालीमुळे बिहारमधील सत्तासमीकरणांमध्ये मोठा बदल होऊ शकतो. (Bihar Politics) जनता दल (युनायटेड) (जेडीयू) अंतर्गत या संदर्भात हालचाली वाढल्या असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. जर नितीश कुमार राज्यसभेवर गेले, तर बिहारचे मुख्यमंत्रिपद रिक्त होईल. अशा परिस्थितीत हे पद भाजपकडे जाऊ शकते, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जेडीयू आणि भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वामध्ये बैठका सुरू असल्याचे समजते. बिहारमधील सध्याच्या संख्याबळाच्या आधारे भाजप मुख्यमंत्रिपदावर दावा करू शकतो, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. तसेच, नितीश कुमार यांना केंद्रात मोठी भूमिका दिली जाऊ शकते, अशीही शक्यता वर्तवली जात आहे. Nitesh Kumar दरम्यान, जेडीयूचे कार्यकारी अध्यक्ष संजय झा दिल्लीहून तातडीने पटना येथे दाखल झाल्याने चर्चांना अधिक वेग आला आहे. पटना येथे येण्यापूर्वी त्यांनी केंद्रीय मंत्री ललन सिंह यांच्याशी चर्चा केल्याची माहिती आहे. तसेच ते भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या संपर्कात असल्याचेही बोलले जात आहे. याआधी राज्यसभेसाठी निशांत कुमार यांचे नाव पुढे येत होते. नितीश कुमार यांचे पुत्र निशांत कुमार गेल्या काही दिवसांपासून सार्वजनिक कार्यक्रमांत सक्रिय दिसत आहेत. १ मार्च रोजी वडिलांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी उपस्थित राहून केक कापण्याचा कार्यक्रम केला तसेच मंदिरात जाऊन पूजा केल्याचेही समोर आले. Bihar Politics या सर्व घडामोडींमुळे बिहारची पुढील सत्ता कोणाकडे जाणार, याबाबत राजकीय चर्चांना उधाण आले आहे. राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुढील काही दिवसांत मोठा निर्णय होण्याची शक्यता नाकारता येत नाही.