Nira River Flood: ‘कही खुशी, कही गम’! नीरा खोऱ्यातील धरणे १००% भरली; पण पुरामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
Nira River Flood: नीरा खोऱ्यातील चारही धरणांत मुबलक पाणीसाठा; वीर धरणातून टप्प्याटप्प्याने ६४ हजार क्युसेक वेगाने नीरा नदीपात्रात पाणी मोकळे.

Nira River Flood – नीरा खोऱ्यातील चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे धरणांमध्ये मुबलक पाणीसाठा निर्माण झाला असून चारही धरणे शंभर टक्के भरली असून यंदा शेतकरी आणि नागरिकांची वर्षभराच्या शेतीसिंचन व पिण्याच्या पाण्याची चिंता दूर झाली आहे. मात्र, या आनंदावर नीरा नदीच्या महापुराने विरजण घातले असून नदीकाठच्या शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागले आहे.
वीर धरण शंभर टक्के भरल्यानंतर धरणातून सुरुवातीला पंधरा हजार की सेक्स वेगाने पाणी सोडण्यात आले. यानंतर यामध्ये टप्प्याटप्प्याने वाढ करून सुमारे ६४ हजार क्यूसेक्स वेगाने पाणी नीरा नदीपात्रात सोडण्यात आले. त्यामुळे नदीच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाली. नींबूत, होळ व मुरूम परिसरातील नदीवरील कोल्हापूर पद्धतीचे बंधारे पाण्याखाली गेले.

सोमेश्वरनगर (ता. बारामती) : नीरा नदीला आलेल्या महापुराने नदीकाठच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
पाण्याच्या प्रवाहामुळे नदीकाठच्या भागात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली. महापुराचे पाणी नदीलगतच्या शेतांमध्ये शिरल्याने भाजीपाला पिके वाहून गेली. जनावरांसाठी केलेला चारा देखील वाहून गेला. यामुळे जनावरांच्या चाऱ्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. तर अनेक ठिकाणी उभा असलेला ऊस आडवा झाला. तसेच बांधावरून पाणी वाहिल्याने सुपीक मातीही वाहून गेली असून शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
पाटबंधारे विभागाने वेळीच माहिती दिल्याने नदीकाठच्या लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले होते तसेच जनावरांना देखील सुरक्षित स्थळी हलवल्याने मोठा अनर्थ टळला. एकीकडे धरणे भरल्याने बारामतीच्या पश्चिम भागातील पाण्याची चिंता पूर्णपणे दूर झाली असली, तरी दुसरीकडे महापुरामुळे नदीकाठच्या शेतकऱ्यांवर संकट कोसळले आहे. त्यामुळे यंदाच्या पावसाने “कही खुशी, कही गम” अशी परिस्थिती निर्माण केल्याची भावना शेतकरी व्यक्त करत आहेत.




