Nira Morgaon Road: नीरा–मोरगाव रोड बनलाय ‘मृत्यूचा सापळा! दीड महिन्यात ७ जणांचा बळी; रस्त्यावर नक्की काय घडतंय?
Nira Morgaon Road: बारामती तालुक्यातील नीरा–मोरगाव राज्य मार्गावर अपघातांचे सत्र सुरुच; दीड महिन्यात ७ जणांचा दुर्दैवी मृत्यू.
Nira Morgaon Road – बारामती तालुक्याच्या पश्चिम भागातील नीरा–मोरगाव राज्य मार्ग या प्रचंड वर्दळीच्या रस्त्यांवर गेल्या दीड महिन्यात झालेल्या भीषण अपघातांमध्ये तब्बल सात जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये बहुतांश तरुण विद्यार्थी असल्याने पालक, विद्यार्थी आणि नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. सलग घडणाऱ्या अपघातांमुळे रस्ते सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून,
धोकादायक ठिकाणी तातडीने प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. नीरा–मोरगाव राज्य मार्गावरील चौधरवाडी फाटा येथे १० जून रोजी झालेली दुर्घटना सर्वाधिक हृदयद्रावक ठरली. मुरूम (ता. फलटण) येथील सख्ख्या बहिणी सेजल ज्ञानेश्वर बोडरे (वय १७) व अक्षरा ज्ञानेश्वर बोडरे (वय १५) यांचा अपघातात जागीच मृत्यू झाला.
गंभीर जखमी झालेला त्यांचा भाऊ पवन ज्ञानेश्वर बोडरे (वय १२) याचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला. एकाच कुटुंबातील तीन भावंडांचा दुर्दैवी अंत झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली. यानंतर वाघळवाडी येथे स्कॉर्पिओ आणि दुचाकीच्या अपघातात करण शरद भगत (वय १९) गंभीर जखमी झाला होता. त्याच्यावर पुण्यात उपचार सुरू असताना १६ जुलै रोजी त्याचा मृत्यू झाला.
या घटनेनंतर वाघळवाडी परिसरातील धोकादायक रस्त्याबाबत नागरिकांनी चिंता व्यक्त केली असून, आवश्यक सुरक्षाविषयक उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. मोरगाव–सुपे मार्गावर १७ जुलै रोजी भरधाव ट्रकच्या धडकेत महाविद्यालयीन विद्यार्थिनी हर्षदा जनार्दन खैरे (वय २०) हिचा जागीच मृत्यू झाला. सोमेश्वरनगर येथे पुढील शिक्षणासाठी प्रवेश प्रक्रिया पूर्ण करून घरी परतत असताना तिच्यावर काळाने घाला घातल्याने कुटुंबीयांसह परिसरावर शोककळा पसरली.
त्यानंतर २६ जुलै रोजी सुपे–चौफुला मार्गावरील अहिल्यादेवी चौकात मालवाहू ट्रक आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत सोमनाथ दत्तात्रय ठोंबरे आणि शुभम दत्तात्रय ठोंबरे या दोन सख्ख्या भावांचा मृत्यू झाला. एकाचा जागीच, तर दुसऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
विद्यार्थ्यांना दुचाकी देताना पालकांनीही काळजी घ्यावी
अपघातातील मृतांमध्ये तरुण विद्यार्थी मोठ्या संख्येने असल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासाचा प्रश्न गंभीर बनला आहे. अल्पवयीन किंवा नव्याने वाहन चालविणाऱ्या विद्यार्थ्यांना पालकांनी वाहतूक नियमांचे पालन, हेल्मेटचा वापर, वेगमर्यादा आणि सुरक्षित वाहनचालना याबाबत सातत्याने मार्गदर्शन करणे गरजेचे आहे. शाळा-महाविद्यालये, पालक-शिक्षक, पोलीस आणि आरटीओ यांनी समन्वय साधून विद्यार्थ्यांमध्ये रस्ता सुरक्षेबाबत व्यापक जनजागृती करणे आवश्यक आहे.
धोकादायक ठिकाणी तातडीने उपाययोजनांची गरज
वारंवार अपघात होणाऱ्या ठिकाणी वेगमर्यादा निश्चित करणे, आवश्यक ठिकाणी स्पीड ब्रेकर बसविणे, इशारा व माहिती फलक लावणे, सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे तसेच वाहतूक नियंत्रणासाठी प्रभावी उपाययोजना करणे गरजेचे आहे. रस्त्यावरील धोकादायक वळणे, चौक आणि फाटे याठिकाणी प्रकाशव्यवस्था व सुरक्षा उपाय वाढविण्याचीही मागणी नागरिकांकडून होत आहे.
प्रशासनाने वेळीच ठोस पावले उचलली नाहीत, तर आणखी निष्पाप जीव जाण्याची भीती व्यक्त होत आहे. याच रोडवरती नीरे पासून मोरगाव पर्यंत जागोजागी पडलेले खड्डे देखील वाहन चालक तसेच टू व्हीलर चालकांना धोकादायक आहेत.






