Today TOP 10 News: …तरीही छगन भुजबळ निर्दोष, 150 रुपयांत विवाह, जनगणनेसाठी प्रश्नांची यादी ते मोबाईल रिचार्ज महागणार… वाचा टाॅप बातम्या

Today TOP 10 News: …तरीही छगन भुजबळ निर्दोष, महाराष्ट्र सदन घोटाळा, 20 हजार पानांचे आरोपपत्र
महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांना मोठा कायदेशीर दिलासा मिळालाय. सक्तवसुली संचालनालयाच्या अर्थात ईडी विशेष न्यायालयाने भुजबळ यांची या प्रकरणातून निर्दोष मुक्तता केलीय.
२० हजार पानांचे आरोपपत्र आणि सुमारे ६० साक्षीदारांचे जबाब नोंदवूनही तपास यंत्रणेची केस तांत्रिक मुद्द्यावर कमकुवत ठरली. या निकालाचा मुख्य आधार ‘प्रेडिकेट ऑफेन्स’ हा ठरला. नियमानुसार, मूळ गुन्ह्यातून आरोपीची सुटका झाल्यास ईडीची मनी लाँड्रिंगची केस टिकू शकत नाही. जेव्हा छगन भुजबळ राज्याचे उपमुख्यमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून कार्यरत होते.
त्यावेळी दिल्लीत महाराष्ट्र सदनाचे बांधकाम करण्यासाठी चमणकर एंटरप्रायजेस या कंपनीला कोणत्याही निविदा प्रक्रियेशिवाय कंत्राट दिल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. २०१६ मध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना या प्रकरणाला वेग आला होता, ज्यामध्ये भुजबळांना दोन वर्षे तुरुंगवासही भोगावा लागला. अखेर पुराव्यांच्या अभावी न्यायालयाने त्यांना सर्व आरोपांतून मुक्त केलेय.
माजी आमदाराच्या मुलीचा 150 रुपयांत विवाह; खर्च टाळून शिक्षकांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत
सध्याच्या काळात कोट्यवधींच्या खर्चिक विवाहांचे फॅड वाढत असताना, सोलापूरचे माजी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत यांच्या कन्येने एक नवा आदर्श समाजासमोर ठेवलाय. उच्चशिक्षित सुषमा सावंत आणि शासकीय अभियंता शुभम शिंदे यांनी कोणत्याही थाटामाटाशिवाय अवघ्या १५० रुपयांत नोंदणीकृत पद्धतीने विवाह केला.
हुंडा, सोने आणि डामडौलावर होणारा अमाप खर्च टाळून या दाम्पत्याने अत्यंत साध्या पद्धतीने आयुष्याची नवी सुरुवात केली. केवळ साधेपणावरच न थांबता, या विवाह सोहळ्यासाठी खर्च होणारे सुमारे २५ ते ३० लाख रुपये विनाअनुदानित शिक्षकांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत म्हणून देण्याचा कौतुकास्पद निर्णय या कुटुंबाने घेतलाय.
उच्चशिक्षित वधू-वरांच्या या क्रांतीकारक निर्णयामुळे सर्व स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतोय. सामाजिक जाणीव जपणारा हा सोहळा खऱ्या अर्थाने समाजासाठी प्रेरणादायी ठरलाय.
पंढरपुरात विठ्ठल-रुक्मिणीचा विवाहसोहळा; मंदिर परिसर ‘विठ्ठल-विठ्ठल’च्या गजराने दुमदुमला
विठूरायाचा जयघोष, मंत्रोच्चारांचा मंगलमय सूर आणि भाविकांच्या उत्साहात आज वसंत पंचमीच्या शुभ मुहूर्तावर परंपरेनुसार श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेचा शाही विवाहसोहळा मोठ्या थाटामाटात संपन्न झाला. माघ शुद्ध पंचमीचे औचित्य साधून दुपारी ठीक बारा वाजता विठ्ठल मंदिरात पारंपरिक पद्धतीने हा सोहळा पार पडला.
यावेळी विठुरायाला पांढराशुभ्र पोशाख, डोक्यावर पगडी आणि कपाळी मुंडावळ्या परिधान केल्या होत्या, तर रुक्मिणी मातेला पैठणी व सुवर्ण अलंकारांनी नटवले होते. मंदिर समितीचे सहअध्यक्षांसह गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते देवाला गुलाल लावून पूजेचा प्रारंभ झाला.
मंगल घटिका येताच अक्षतांचा वर्षाव झाला आणि संपूर्ण मंदिर परिसर ‘विठ्ठल-विठ्ठल’ च्या गजराने दुमदुमून गेला. विवाहानंतर भाविकांनी पारंपरिक लोकगीतांवर ठेका धरत आनंद व्यक्त केला. फुलांच्या मनमोहक सजावटीने सजलेल्या मंदिरात हा ‘याची देही याची डोळा’ अनुभवण्यासाठी हजारो वारकरी उपस्थित होते.
जनगणनेसाठी 33 प्रश्नांची यादी जाहीर; 1 एप्रिलपासून पहिल्या टप्प्याला सुरुवात
केंद्र सरकारने जनगणनेसाठी ३३ प्रश्नांची अधिकृत सूची जाहीर केली असून १ एप्रिलपासून घरांच्या नोंदणीला सुरुवात होणार आहे. ही देशातील पहिली पूर्णतः डिजिटल जनगणना ठरेल.
भारत सरकारचे रजिस्ट्रार जनरल मृत्युंजय कुमार नारायण यांनी गुरुवारी प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेनुसार, पहिल्या टप्प्यात घरांची स्थिती, छताचे व भिंतींचे साहित्य, पिण्याच्या पाण्याची सोय आणि कुटुंबातील सोयीसुविधांची माहिती घेतली जाईल. या प्रक्रियेत कुटुंबप्रमुख, कुटुंबातील सदस्यांची संख्या, अन्नधान्याचा प्रकार आणि मालकीच्या वाहनांची माहिती विचारली जाणार आहे.
प्रत्येक राज्याला ही मोहीम पूर्ण करण्यासाठी ३० दिवसांचा कालावधी दिला जाईल. ३१ जानेवारीपर्यंत सर्व तांत्रिक अधिसूचना जारी केल्या जाणार असून प्रशिक्षणांनंतर प्रत्यक्ष डिजिटल नोंदणीला वेग येईल. तब्बल १५ वर्षांनंतर होणारी ही जनगणना देशाच्या भविष्यातील नियोजनासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जातेय.
इराणवर हल्ला करण्याच्या तयारीत अमेरिका; ट्रम्प यांचा मोठा इशारा
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणविरुद्ध पुन्हा एकदा युद्ध छेडण्याचे संकेत दिल्याने आखाती देशांत तणाव वाढलाय. इराणवर कडक नजर ठेवली जात असून अमेरिकेचा एक मोठा युद्धनौकांचा ताफा खाडी क्षेत्राकडे रवाना झाला असल्याची माहिती खुद्द ट्रम्प यांनी दिली.
जर इराणने आपल्या कैद्यांना फाशी देण्याचे धाडस केले, तर गेल्या जूनमध्ये इराणच्या अणुप्रकल्पावर झालेल्या हल्ल्यापेक्षाही भीषण हल्ला केला जाईल, अशी कठोर चेतावणी ट्रम्प यांनी दिलीय. गुरुवारी एअर फोर्स वनमध्ये माध्यमांशी बोलताना ट्रम्प म्हणाले की, इराणच्या दिशेने आमची अनेक जहाजे केवळ खबरदारी म्हणून जात असली, तरी प्रसंगी त्यांचा वापर करण्यास आम्ही मागे हटणार नाही.
अमेरिकेने जून २०२५ मध्ये इराणच्या अणुकेंद्रांवर हवाई हल्ले केले होते, परंतु आता होणारा संभाव्य हल्ला त्यापेक्षाही अधिक शक्तिशाली असेल, असे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनीही प्रत्युत्तर देताना म्हटले की, जर पुन्हा हल्ला झाला तर इराण आपल्या सर्व शक्तीनिशी प्रत्युत्तर देईल.
घरबसल्या आधार-UAN लिंक करा; सोपी प्रक्रिया जाणून घ्या
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) आता पीएफ खाते आधार कार्डाशी लिंक करणे बंधनकारक केलेय. यामुळे पीएफ काढणे, ई-नॉमिनेशन आणि खाते हस्तांतरण यांसारख्या प्रक्रिया अधिक सुलभ आणि पारदर्शक होणार आहेत.
आधार लिंक नसल्यास क्लेम सेटलमेंटमध्ये अडथळे येऊ शकतात किंवा खाते प्रतिबंधित केले जाऊ शकते. ही प्रक्रिया अत्यंत सोपी असून नोकरदार व्यक्ती ईपीएफओच्या अधिकृत पोर्टलवर जाऊन घरबसल्या पूर्ण करू शकतात. लिंकिंगसाठी युनिफाइड पोर्टलवर लॉग-इन करून ‘मॅनेज’ टॅबमधील ‘केवायसी’ पर्यायावर क्लिक करावे लागते. तिथे आधार क्रमांक आणि नाव नोंदवल्यानंतर यूआयडीएआयद्वारे पडताळणी केली जाते.
साधारणपणे दोन दिवसांत नियोक्ता आणि संबंधित विभागाकडून मंजुरी मिळाल्यावर खाते अपडेट होते. ज्यांना ऑनलाइन प्रक्रिया शक्य नाही, ते ईपीएफओ कार्यालयात जाऊन आधार सीडिंग फॉर्मद्वारे ही लिंक प्रक्रिया पूर्ण करू शकतात. महत्त्वाची बाब म्हणजे, आधार आणि पीएफ रेकॉर्डवरील सर्व माहिती एकसमान असणे आवश्यक आहे.
शेअर बाजारात मोठी घसरण; गुंतवणूकदारांचे 6 लाख कोटी पाण्यात
भारतीय शेअर बाजारात शुक्रवारी मोठी पडझड पाहायला मिळाली, ज्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जागतिक अनिश्चितता, रुपयाचे ऐतिहासिक अवमूल्यन आणि परदेशी गुंतवणूकदारांनी केलेली तुफान विक्री यामुळे बीएसई सेन्सेक्स ७६९ अंकांच्या घसरणीसह ८१,५३७ वर बंद झाला.
डॉलरच्या तुलनेत रुपया ९१.९९ पर्यंत कमकुवत झाल्याने आयात खर्च वाढण्याची भीती व्यक्त होत असून, त्याचा थेट परिणाम बाजारपेठेवर झालाय. आगामी केंद्रीय अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांनी सावध पवित्रा घेत नफेखोरीवर भर दिला.
अमेरिका आणि युरोपमधील भू-राजकीय तणावामुळे जागतिक बाजारपेठांमधून नकारात्मक संकेत मिळत होते, ज्यामुळे घरगुती बाजारातही विक्रीचा दबाव वाढला. या एकाच दिवसाच्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे सुमारे ६ लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले असून, कंपन्यांच्या तिमाही निकालांनी निराशा केल्याने बाजारातील विश्वासाला तडा गेलाचेही दिसतेय.
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार; जूनपर्यंत दरवाढीची शक्यता
सर्वसामान्यांच्या खिशाला पुन्हा एकदा कात्री बसणार असून, जून २०२६ पर्यंत मोबाईल रिचार्जच्या दरात १५ टक्क्यांपर्यंत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. जिओ, एअरटेल आणि व्होडाफोन-आयडिया यांसारख्या आघाडीच्या कंपन्या आपले कॉलिंग आणि डेटा प्लॅन्स महाग करण्याच्या तयारीत आहेत.
देशभरात ५जी नेटवर्कचा विस्तार करण्यासाठी कंपन्यांनी मोठी गुंतवणूक केली असून, त्या तुलनेत सरासरी उत्पन्न कमी असल्याने हा निर्णय घेतला जात असल्याचे समजते. सध्या इंटरनेट आणि मोबाईल ही मानवाची मूलभूत गरज बनलीय.
डिजिटल पेमेंटपासून शिक्षणापर्यंत सर्वच गोष्टी मोबाईलवर अवलंबून असताना वारंवार होणारी ही दरवाढ ग्राहकांसाठी चिंतेचा विषय ठरतेय. सोशल मीडियावर या निर्णयाविरुद्ध संताप व्यक्त होतोय. टेलिकॉम कंपन्यांनी अद्याप अधिकृत घोषणा केली नसली तरी, बाजारपेठेतील हालचाली पाहता ग्राहकांना लवकरच आर्थिक फटका बसण्याचे संकेत मिळत आहेत.
‘बॉर्डर 2’ चित्रपट झाला रिलीज; पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसवर धमाका
अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आज ‘बॉर्डर २’ हा चित्रपट थिएटरमध्ये आला असून प्रेक्षकांनी त्याला डोक्यावर घेतलेय. सनी देओल, वरुण धवन आणि दिलजीत दोसांझ या कलाकारांनी सैनिकांच्या भूमिका इतक्या भारी साकारल्यात की, प्रत्येक भारतीय अभिमानाने भारावून जातोय.
या सिनेमात फक्त सीमेवरची लढाईच नाही, तर आपल्या जवानांच्या मनात चाललेली घालमेल आणि त्यांच्या कुटुंबाची ओढ खूपच भावनिकरीत्या दाखवलीय. ‘घर कब आओगे’ हे गाणं ऐकताना अंगावर काटा येतो आणि डोळ्यात पाणी उभे राहते. चित्रपटात सनी पाजींचा तोच जुना करारी बाणा पाहायला मिळतो, तर अहान शेट्टीने आपल्या अभिनयाने सर्वांनाच थक्क केलेय.
शत्रू देशाला चोख प्रत्युत्तर देणारे भारतीय सैन्य आणि चित्रपटाचा जबरदस्त क्लायमॅक्स पाहून थिएटरमध्ये टाळ्यांचा कडकडाट होतोय. थोडक्यात सांगायचे तर, हा चित्रपट म्हणजे देशभक्ती आणि भावनांचे एक उत्तम मिश्रण आहे, जो प्रत्येक सिनेप्रेमीने पाहायलाच हवा.
आरसीबीचा मालक बदलणार? आदर पूनावाला लावणार बोली
आयपीएल २०२६ पूर्वी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) संघाचे मालकी हक्क बदलण्याची शक्यता आहे. सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ आदर पूनावाला यांनी आरसीबी खरेदी करण्यासाठी मजबूत बोली लावण्याची इच्छा ‘एक्सव’वरून जाहीर केली आहे.
त्यांच्यासह ‘होम्बले फिल्म्स’ देखील शर्यतीत असल्याची चर्चा आहे. आयपीएल २०२५ चे जेतेपद जिंकल्यानंतर बंगळुरूमध्ये झालेल्या विजयी परेडमध्ये चेंगराचेंगरी होऊन ११ जणांचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेमुळे फ्रँचायझीच्या प्रतिमेला धक्का बसला असून, मालकी हक्क बदलण्याच्या हालचालींना वेग आला आहे. आगामी काळात आरसीबीचा नवा मालक कोण असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागलेय.









