Revati Sule wedding: राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी आपली कन्या रेवती सुळे यांच्या विवाहाची घोषणा सोशल मीडियाद्वारे केली असून, नागपूरचे प्रसिद्ध उद्योजक अरुण लखानी यांचे सुपुत्र सारंग लखानी यांच्याशी हा विवाह संपन्न होणार आहे. या घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आणि सोशल मीडियावर चर्चांना उधाण आले आहे. याचे मुख्य कारण म्हणजे लखानी कुटुंबाची पार्श्वभूमी ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी (RSS) अत्यंत जवळची मानली जाते. अरुण लखानी हे स्वतः एक सक्रिय संघ स्वयंसेवक असून संघाच्या अनेक महत्त्वपूर्ण उपक्रमांमध्ये त्यांचा मोठा सहभाग असतो. दुसरीकडे, पवार कुटुंब हे नेहमीच पुरोगामी विचारांचे पुरस्कर्ते राहिले असून त्यांनी वेळोवेळी संघाच्या विचारसरणीवर टीका केली आहे. यामुळेच सुप्रिया सुळे यांनी संघ परिवारात आपली मुलगी देण्याचा निर्णय घेतल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. विवाहामागे राजकीय समीकरणे? या विवाह सोहळ्याकडे केवळ कौटुंबिक नाते म्हणून न पाहता, राजकीय चष्म्यातूनही पाहिले जात आहे. गेल्या काही दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहेत. त्यातच आता सुप्रिया सुळे यांचे नाव केंद्रात मंत्रिपदासाठी चर्चेत असल्याने, या विवाहामागे काही राजकीय समीकरणे दडलेली आहेत का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मात्र, सुप्रिया सुळे यांनी या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला असून, या लग्नात मुख्यमंत्र्यांनी मध्यस्थी केल्याच्या अफवांचेही खंडन केले आहे. रेवती आणि सारंग हे गेल्या वर्षभरापासून एकमेकांना ओळखत असून, त्यांच्या पसंतीनंतरच हा विवाह निश्चित झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. अजित दादा असतानाच हे लग्न ठरले होते – हा आनंदाचा क्षण व्यक्त करताना सुप्रिया सुळे भावूक झाल्या होत्या. त्यांनी सांगितले की, त्यांच्या सहाही भावांनी या नात्याला मनापासून आशीर्वाद दिले आहेत. विशेषतः अजित दादा असतानाच हे लग्न ठरले होते, हे त्या आपले भाग्य समजतात. दुर्दैवाने दादांचे २८ तारखेला निधन झाले, अन्यथा संपूर्ण पवार कुटुंब ३० तारखेला एकत्रितपणे या विवाहाची घोषणा करणार होते. कौटुंबिक दुःखाच्या सावलीत ही आनंदाची बातमी समोर आल्याने राजकीय टीकाकारांपेक्षा सुभेच्छुकांची संख्या मोठी असल्याचे दिसत आहे. सारंग लखानी काय करतात? रेवती यांचे होणारे पती सारंग लखानी हे ‘विश्वराज ग्रुप’चे कार्यकारी संचालक म्हणून कार्यरत आहेत. गेल्या आठ वर्षांपासून ते जल व्यवस्थापन आणि रस्ते पायाभूत सुविधांच्या विकासात आपल्या कंपनीचे नेतृत्व करत आहेत. व्यावसायिक यशासोबतच सारंग हे एक उत्कृष्ट बॅडमिंटनपटू असून त्यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. उच्चशिक्षित आणि क्रीडाप्रेमी अशा दोन कर्तबगार तरुणांची ही नवी जोडी आता महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक पटलावर चर्चेचा विषय ठरली आहे. हेही वाचा: भारतासोबतचे संबंध कसे असतील? बांगलादेशच्या भावी पंतप्रधानांचे एकाच वाक्यात खळबळजनक उत्तर