Reel Star Rohini Paradhye : रोहिणी पाराध्ये प्रकरणात मोठी अपडेट
Reel Star Rohini Paradhye : या घटनेमुळे मंगळवेढा परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून सोशल मीडियावरही अनेकांनी रोहिणी पाराध्ये यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

Reel Star Rohini Paradhye : सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स असलेल्या प्रसिद्ध रिल स्टार रोहिणी पाराध्ये हिने मंगळवारी स्वतःच्या हॉटेलच्या स्वयंपाकघरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मंगळवेढा तालुक्यात घडली. अवघ्या २५ वर्षीय विवाहित रोहिणी आपल्या पती निलेश पाराध्ये यांच्यासह ‘हॉटेल ग्रामपंचायत’ चालवत होती. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
रोहिणी आणि तिचा पती सोशल मीडियावर विनोदी व कौटुंबिक रिल्स तयार करत होते. त्यांच्या हॉटेलच्या स्वयंपाकघरातूनच अनेक रिल्स शूट केले जात होते. मात्र, त्याच स्वयंपाकघरात पत्र्याच्या लोखंडी अँगलला दोरी बांधून रोहिणीने आत्महत्या केल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे.
प्राथमिक माहितीनुसार, तणाव आणि त्यातून झालेल्या वादातून रोहिणीने टोकाचे पाऊल उचलल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून अधिक तपास सुरू आहे.
“फोन घेतला आणि पायाखालची जमीन सरकली”
रोहिणीच्या मृत्यूच्या दिवशी नेमकं काय घडलं, याबाबत तिचे सासरे विलास पाराध्ये यांनी माहिती दिली. “घटना घडली तेव्हा मी ग्रामसभेला गेलो होतो. सभा संपल्यानंतर घरी निघालो. मात्र माझा मोबाईल ग्रामपंचायतीतच राहिल्याचं लक्षात आल्यानं मी परत गेलो. तिथे लोकांनी तुमचा फोन सतत वाजत असल्याचं सांगितलं. फोन घेताच समोरून आत्महत्येची घटना घडल्याचं सांगण्यात आलं. ‘अनुने फास घेतला’ हे ऐकून मी हादरलो,” असे त्यांनी सांगितले.
“तिला तातडीने रुग्णालयात घेऊन जा, असं मी सांगितलं. त्यानंतर मी थेट हॉस्पिटलमध्ये पोहोचलो. तेथून तिला पुढील उपचारासाठी दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आलं. डॉक्टरांनी तपासल्यानंतर तिचा मृत्यू झाल्याचं सांगितलं. सुखाने संसार सुरू होता, व्यवसायही चांगला सुरू होता. तरी तिने इतकं टोकाचं पाऊल का उचललं, हे आम्हालाही समजत नाही,” अशा शब्दांत विलास पाराध्ये यांनी भावना व्यक्त केल्या.
किरकोळ वादातून टोकाचं पाऊल?
दरम्यान, प्राथमिक तपासात हॉटेल उघडण्याच्या कारणावरून पती-पत्नीमध्ये किरकोळ वाद झाल्याची माहिती समोर आली आहे. त्या वादानंतर रोहिणीने रागाच्या भरात हे टोकाचे पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. मंगळवेढा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डी यांनी सांगितले की, “रोहिणी पाराध्ये यांच्या मृत्यूप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. प्राथमिक माहितीनुसार कौटुंबिक कारणातून घटना घडल्याचे दिसून येत असून पुढील तपास सुरू आहे.”
प्राथमिक माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून रोहिणी यांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यात तणाव वाढला होता. हॉटेल व्यवसायाच्या वाढत्या जबाबदाऱ्या, नव्याने सुरू झालेल्या शाखा आणि कामाच्या तणावामुळे पती-पत्नीमध्ये वाद होत असल्याची चर्चा स्थानिक पातळीवर सुरू आहे. पोलिसांकडूनही तणावातून हे टोकाचे पाऊल उचलले असावे, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
रोहिणी यांचा हा दुसरा विवाह –
रोहिणी यांचा हा दुसरा विवाह असल्याची माहितीही समोर आली आहे. पहिल्या विवाहातून विभक्त झाल्यानंतर त्यांची निलेश पाराध्ये यांच्याशी ओळख झाली होती. त्यानंतर दोघांनी प्रेमविवाह केला होता. मात्र, अलिकडच्या काळात वैवाहिक आयुष्यात काही मतभेद निर्माण झाले होते का, याचाही तपास पोलीस करत आहेत.
सोशल मीडियावर विविध तर्क-वितर्कांना उधाण –
रोहिणी यांच्या मृत्यूनंतर सोशल मीडियावर विविध तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. काहीजण कौटुंबिक कारणांकडे बोट दाखवत आहेत, तर काहींच्या मते व्यवसायातील वाढत्या तणावामुळे त्या मानसिक दडपणाखाली होत्या. मात्र, आत्महत्येमागील ठोस कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून पोलिसांचा तपास सुरू आहे.
या घटनेमुळे मंगळवेढा परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून सोशल मीडियावरही अनेकांनी रोहिणी पाराध्ये यांना श्रद्धांजली वाहिली आहे.





