Rain Alert : पुढील 4 दिवस ‘या’ जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता
Rain Alert : कोकण-घाटमाथ्यावर अतिमुसळधार पावसाची शक्यता; नदीकाठ, डोंगराळ व सखल भागातील नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

Rain Alert : राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय झाला असून ३ ते ७ जुलैदरम्यान महाराष्ट्रातील बहुतांश भागात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने (IMD) व्यक्त केला आहे. विशेषतः कोकण, घाटमाथा आणि विदर्भातील काही भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली असून, नदीकाठ, डोंगराळ आणि सखल भागातील नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, कोकण आणि घाटमाथ्यावर अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असून काही भागांत अतिवृष्टीचा इशाराही देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे. विदर्भातही ३ ते ७ जुलैदरम्यान काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
महाराष्ट्र-कर्नाटक किनारपट्टीदरम्यान सक्रिय झालेला ऑफ-शोअर ट्रफ आणि वायव्य बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र यामुळे राज्यातील पावसाचा जोर वाढणार असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. हे कमी दाबाचे क्षेत्र पुढील दोन दिवसांत अधिक प्रभावी होण्याची शक्यता आहे.
नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी –
मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नदीकाठ, डोंगराळ आणि सखल भागातील नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी, स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे तसेच अनावश्यक प्रवास टाळावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस –
दरम्यान, रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण शहरात दुपारनंतर जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळला. त्यामुळे शहरातील सखल भागांत पाणी साचले. चिपळूणसह खेड, गुहागर आणि दापोली परिसरातही पावसाचा जोर कायम असून खेड तालुक्यातील जगबुडी नदीने इशारा पातळी ओलांडल्याची नोंद झाली आहे.
नाशिक जिल्ह्यातही महिनाभराच्या विश्रांतीनंतर पावसाने दमदार पुनरागमन केले. कळवणच्या पश्चिम पट्ट्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले, तर काही घरांच्या पायऱ्यांपर्यंत पावसाचे पाणी पोहोचले. कच्च्या घरांच्या भिंती कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे. मात्र, या पावसामुळे भात लागवड आणि खरीप हंगामातील पेरण्यांना गती मिळणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.





