IAS Tukaram Mundhe: राज्य शासनाने आज आयएएस अधिकाऱ्यांच्या व्यापक बदल्या जाहीर केल्या असून, त्यात तुकाराम मुंडे यांच्याकडे महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. सध्या दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव असलेले मुंडे यांची बदली आपत्ती व्यवस्थापन, पुनर्वसन (R&R), महसूल व वन विभागाच्या सचिवपदी करण्यात आली आहे. राज्यात वाढत्या नैसर्गिक आपत्तींच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या नियुक्तीकडे विशेष लक्ष लागले आहे. दरम्यान, महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांची मुख्यमंत्री कार्यालयात अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्यमंत्री कार्यालयातील अतिरिक्त मुख्य सचिव अश्विनी भिडे यांची मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तपदी बदली झाली आहे. कृषी विभागातील अतिरिक्त मुख्य सचिव विकास चंद्र रस्तोगी यांना वित्त विभागात अतिरिक्त मुख्य सचिव (आर्थिक सुधारणा) म्हणून नेमण्यात आले आहे. तर आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या प्रधान सचिव विनिता वैद सिंगल यांची मृद व जलसंधारण विभागाच्या प्रधान सचिवपदी बदली करण्यात आली आहे. नानाजी देशमुख कृषी संजीवनी (पोकरा) प्रकल्पाचे प्रकल्प संचालक परिमल सिंह यांची कृषी विभागात सचिव म्हणून नियुक्ती झाली आहे. लहु माळी यांना शिवशाही पुनर्वसन प्रकल्प लिमिटेड, मुंबई येथे व्यवस्थापकीय संचालक म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. माणिक गुरसाळ यांची दिव्यांग कल्याण विभागाच्या सचिवपदी नियुक्ती झाली आहे. राज्य कर विभागातील संयुक्त आयुक्त प्रेरणा देशभ्रतार यांची मत्स्य व्यवसाय आयुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे. पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांची वसई-विरार महापालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या बदल्यांमध्ये विशेषतः तुकाराम मुंडे यांच्याकडे आपत्ती व्यवस्थापनासारखी महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आल्याने प्रशासनाला अधिक गतिमान व प्रभावी दिशा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.