धनंजय मुंडेंचा दोन दिवसापूर्वीच राजीनामा घेतला?

मुंबई – मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी गेल्या अनेक दिवसांपासून केली जात आहे. तसेच अर्थसंकल्पाच्या अधिवेशनपूर्वी देखील महाविकास आघाडीच्या नेत्यांनी घोषणाबाजी करत राजीनाम्याची मागणी केली. आता यावर करुणा शर्मा यांनी आणखी एक गौप्यस्फोट केला आहे. शंभर टक्के दोन दिवस अगोदरच धनंजय मुंडे यांचा राजीनामा लिहून घेतलेला आहे, असा गैप्यस्फोट करुणा शर्मा यांनी केला आहे.
करुणा मुंडे म्हणाल्या, मुख्यमंत्र्यांनी आज सांगितले दोन दिवसांनंतर आम्ही ठरवू. धनंजय मुंडे यांच्यावर पक्षातून दबाव आहे, मात्र त्यांची राजीनामा देण्याची इच्छा नाही. अधिवेशनाच्या पहिल्या दोन दिवसांमध्ये लोकांचे आणि स्वतःच्या पक्षातील आमदार, खासदारांचे किती प्रेशर येते? ही गोष्ट थांबवता येऊ शकते का? ते पाहून त्यांच्या राजीनाम्यावर निर्णय होणार आहे, असा दावाही करुणा यांनी केला आहे.
मला मंत्रालयातून माहिती मिळाली आहे. सर्वांना माहिती आहे, धनंजय मुंडे छोटा मोठा आमदार किंवा मंत्री नाहीत. जो अजितदादा गट आहे, तो अजितदादा गट नसून धनंजय मुंडे गट आहे. त्यामुळे स्वतःच्या पक्षात स्वतःची चालणार. पक्ष त्यांचा आहे मी एवढ्या वर्षांपासून त्यांच्यासोबत आहे, मला सर्व काही माहिती आहे. म्हणूनच मी हे सांगत आहे, असे करुणा म्हणाल्या.
फडणवीसांना भेटण्याचा प्रयत्न करणार
मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटीसाठी निवेदन दिलेले आहे, मात्र त्यांनी मला आतापर्यंत भेटीसाठी वेळ दिला नाही. आता मी त्यांना पुन्हा एकदा आठवण करून देण्यासाठी पत्र देत आहे, त्याचबरोबर विधानभवनात जाण्याचाही प्रयत्न करणार आहे. माझी रोखठोक भूमिका आहे, त्यामुळे मला तिकडे जाऊ देणार नाहीत. मात्र त्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करणार आहे आणि देवेंद्र फडणीस यांना भेटण्याचाही प्रयत्न करणार आहे, असेही करुणा म्हणाल्या.




