DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी यंदाची होळी खऱ्या अर्थाने आनंदाची ठरणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ज्या महागाई भत्त्याच्या (DA) वाढीची प्रतीक्षा होती, ती आता संपण्याची चिन्हे आहेत. सरकार पुढच्या आठवड्यात महागाई भत्त्यात २ टक्क्यांची वाढ जाहीर करण्याची शक्यता आहे. यामुळे कर्मचाऱ्यांचा एकूण महागाई भत्ता ५८ टक्क्यांवरून ६० टक्क्यांवर पोहोचेल. होळीपूर्वी का होणार घोषणा? सरकार साधारणपणे वर्षातून दोनदा महागाई भत्ता वाढवते. ही वाढ जानेवारी आणि जुलैपासून लागू होते, पण त्याची घोषणा सणांच्या मुहूर्तावर केली जाते. यंदा ३ मार्चला होळी आहे, त्यामुळे त्याआधीच ही गूड न्यूज मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गेल्या वर्षीही सरकारने होळी आणि दिवाळीच्या सुमारास अशाच घोषणा केल्या होत्या. हेही वाचा – सेन्सेक्स 317 अंकांनी वधारला, गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 1.73 लाख कोटींची वाढ पगारात नेमकी किती वाढ होईल? महागाई भत्ता हा कर्मचाऱ्यांच्या मूळ पगारावर (Basic Salary) मोजला जातो. समजा एखाद्या कर्मचाऱ्याचा मूळ पगार १८,००० रुपये असेल, तर सध्या ५८ टक्के दराने त्याला १०,४४० रुपये भत्ता मिळतो. आता हा भत्ता ६० टक्के झाला, तर ही रक्कम १०,८०० रुपये होईल. म्हणजेच दरमहा ३६० रुपयांची थेट वाढ होईल. याशिवाय घरभाडे भत्ता आणि इतर भत्ते वेगळे मिळतात, ज्यामुळे एकूण हातात येणारा पगार वाढेल. का वाढतोय हा भत्ता? वाढत्या महागाईचा फटका कर्मचाऱ्यांना बसू नये, म्हणून सरकार हा भत्ता देते. लेबर ब्युरोने दिलेल्या आकडेवारीनुसार, महागाईचा निर्देशांक (AICPI) वाढल्यामुळे नियमानुसार ही २ टक्क्यांची वाढ आता निश्चित मानली जात आहे. ७ व्या वेतन आयोगाची मुदत संपली असली आणि ८ व्या वेतन आयोगाला अजून वेळ असला, तरी दर सहा महिन्यांनी होणारी ही डीए वाढ कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे.