मुंबई – बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेत अभूतपूर्व फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदे भारतीय जनता पार्टीच्या मदतीने राज्याचे मुख्यमंत्री झाले. उद्धव ठाकरे यांना सत्तेवरून पायउतार व्हावे लागले. या घटनाक्रमाला अजून सहा महिनेही झालेले नाहीत. मात्र, आता शिंदे यांनाही फटका बसण्याची शक्यता असून त्यांच्यासोबतच किमान 22 आमदार थेट भाजपमध्ये सामील होणार असल्याचा दावा अन्य कोणी नाही तर शिवसेनेने अर्थात ठाकरे गटाने केला आहे.
भाजप एकनाथ शिंदे यांचा केवळ वापर करून घेतो आहे. ग्रामपंचायत आणि सरपंचपदाच्या निवडणुकीत आपण विजयी झाल्याचा दावा शिंदे गटाकडून केला जातो आहे. मात्र, वस्तुस्थिती अशी आहे की त्यांच्यासोबत असलेले किमान 22 आमदार नाराज असून ते लवकरच थेट भाजपमध्ये दाखल होऊ शकतात.
शिंदे यांनी जे काही केले आहे त्यामुळे राज्यातील जनता नाराज आहे. त्यामुळे नागरिक त्यांना माफ करणार नाहीत असा दावा शिवसेनेने केला आहे. आज राज्यातही आणि दिल्लीतही सगळीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच दिसतात. एकनाथ शिंदे कुठेच दिसत नाहीत. त्यांचा दिल्लीत अजिबात प्रभाव नाही असेही ठाकरे गटाने म्हटले आहे.
दरम्यान, दिल्लीतील ठाकरे गटाच्या एका सूत्राने नाव न सांगण्याच्या अटीवर याला दुजोरा दिला आहे. शिंदे दिल्लीत येतात. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट तर दूरच त्यांना गृहमंत्री अमित शहांच्या भेटीसाठीही महाराष्ट्र सदनात ताटकळत राहावे लागते. बऱ्याचदा तर त्यांना भेटही दिली गेली नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे.