Bangladesh Election Results 2026 : शेख हसीना यांच्या सत्तेनंतर बांगलादेशात पहिल्यांदाच झालेल्या ऐतिहासिक सार्वत्रिक निवडणुकीचे निकाल येण्यास सुरुवात झाली असून, यामध्ये खालिदा झिया यांचे सुपुत्र तारिक रहमान यांच्या नेतृत्वाखालील ‘बांगलादेश नॅशनल पार्टी’ने (BNP) जोरदार मुसंडी मारली आहे. तारिक रहमान यांनी ढाका-१७ आणि बोगरा-६ या दोन्ही मतदारसंघांतून दणदणीत विजय मिळवला असून, सुरुवातीच्या कलांनुसार बीएनपी ६० हून अधिक जागांवर आघाडीवर आहे. निवडणुकीचे मुख्य ठळक मुद्दे: बीएनपीचे खाते उघडले: माजी ॲटर्नी जनरल मोहम्मद असदुज्जमान यांनी झेनाइदाह-१ मधून विजय मिळवत पक्षाचे खाते उघडले. शेख हसीनांचा बहिष्कार: अवामी लीगच्या नेत्या शेख हसीना यांनी ही निवडणूक ‘असंवैधानिक’ आणि ‘मतदाररहित’ असल्याचे सांगत ती रद्द करण्याची मागणी केली आहे. जमात-ए-इस्लामीला धक्का: जमातचे प्रमुख शफीकुर रहमान यांना त्यांच्या स्वतःच्या मतदान केंद्रावर बीएनपी समर्थित उमेदवाराकडून ५ मतांनी पराभव स्वीकारावा लागला. हिंसाचाराच्या सावटाखाली मतदान – गुरुवारी (१२ फेब्रुवारी) सकाळी सुरू झालेले मतदान सायंकाळी ४.३० वाजता संपले. काही ठिकाणी हिंसाचाराच्या घटना घडल्या असल्या तरी, एकूण मतदान प्रक्रिया शांततेत पार पडल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. दुपारी दोन वाजेपर्यंत ४७.९१ टक्के मतदानाची नोंद झाली होती. भारताच्या सीमेवर, विशेषतः जलपाईगुडी भागात बीएसएफला (BSF) हाय अलर्टवर ठेवण्यात आले होते. राजकीय आरोप-प्रत्यारोप – निवडणुकीच्या निकालांदरम्यान राजकीय वातावरण तापले आहे. बीएनपीचे प्रवक्ते मेहदी अमीन यांनी विजयाचा विश्वास व्यक्त करताना म्हटले की, “इतर पक्षांनी मतदारांना घाबरवले नसते, तर मतदानाची टक्केवारी आणखी वाढली असती.” दुसरीकडे, अवामी लीगचे नेते एएफएम बहाउद्दीन नसीम यांनी ही निवडणूक म्हणजे ‘लोकशाहीचा फार्स’ असल्याचे म्हटले आहे. “अवामी लीगवर बंदी घालून जनतेला फसवले गेले आहे. ज्या पक्षाने ११ निवडणुका जिंकल्या, त्याला प्रक्रियेतून बाहेर ठेवणे हे लोकशाहीविरोधी आहे,” असा आरोप त्यांनी केला. ३०० जागांसाठी चुरस – बांगलादेशच्या संसदेत एकूण ३५० जागा आहेत, त्यापैकी ३०० जागांसाठी थेट मतदान होते. यंदा २९९ जागांवर १,९८१ उमेदवार रिंगणात होते. मुहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकारने ही निवडणूक पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी ५ लाख निवडणूक कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली होती. मतदानासोबतच देशात ८४ कलमी सुधारणा पॅकेजवर सार्वमत (Referendum) देखील घेण्यात आले. मुख्य सल्लागारांचे आवाहन – मुहम्मद युनूस यांनी निवडणूक आयोग, सुरक्षा दल आणि माध्यमांचे आभार मानले आहेत. निकाल जाहीर झाल्यानंतर सर्व पक्षांनी लोकशाहीची प्रतिष्ठा राखावी आणि राष्ट्रीय हितासाठी एकत्र राहावे, असे आवाहन त्यांनी केले आहे. दरम्यान, सध्या निकाल आकडे समोर येत आहेत. कोण जिंकेल हे उद्या समजेल. हेही वाचा – Trade deal: अमेरिकेसोबतच्या व्यापारी करारात भारताचा मोठा विजय; कापड उद्योगाला मिळणार ‘झिरो टॅरिफ’चा लाभ