Newasa: तालुक्यातील तेलकुडगाव येथे महापुरुषाच्या पुतळ्याच्या विटंबनेच्या संशयावरून उद्भवलेल्या वादाने हिंसक वळण घेतले असून, सध्या गावात तणावपूर्ण शांतता आहे. परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी गावात राज्य राखीव पोलीस दलाची तुकडी (SRPF) आणि मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून गावाला पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. दरम्यान, पुतळा विटंबनेचा आरोप फेटाळत, ग्रामपंचायतीतील कामाच्या त्रासामुळे माझ्या पतीने केवळ महापुरुषांसमोर आपली कैफियत मांडली, असा दावा पीडित पत्नीने केला आहे. तेलकुडगाव येथील शंकर साळवे हे ग्रामपंचायतीमध्ये कामासाठी गेले होते. मात्र, ग्रामसेवक काळे यांनी काम न केल्याच्या वादातून साळवे यांना मारहाण करण्यात आली. या घटनेनंतर साळवे यांनी गावातील महापुरुषांच्या पुतळ्यासमोर जाऊन आपली व्यथा मांडली. मात्र, ही ‘पुतळा विटंबना’ असल्याचा गैरसमज पसरवून साळवे यांना काही जणांनी बेदम मारहाण केली, असे सांगितले जात आहे. यात साळवे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलीस प्रशासनाचे कडेकोट बंदोबस्त – घटनेचे गांभीर्य ओळखून जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे स्वतः परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. नेवासा तहसीलदार डॉ. संजय बिरादार, पोलीस उपविभागीय अधिकारी आणि पोलीस निरीक्षकांनी गावात तळ ठोकला आहे. अफवा पसरू नये आणि शांतता भंग होऊ नये यासाठी रात्रंदिवस गस्त घातली जात आहे. दलितांच्या शिष्टमंडळाची पोलीस अधीक्षकांशी चर्चा – बुधवारी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष अरुणराव जाधव, जेष्ठ नेते अशोकराव गायकवाड, सुनील वाघमारे यांसह प्रमुख पदाधिकाऱ्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेतली. यावेळी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा सन्मानाने पुन्हा बसवण्यात यावा, शंकर साळवे यांना मारहाण करणाऱ्या दोषींवर कडक गुन्हे दाखल करावेत, पीडित कुटुंबाला संरक्षण द्यावे, या मागण्या मांडण्यात आल्या. “माझ्या पतीने महापुरुषांचे केवळ दर्शन घेतले. ग्रामपंचायतीत काम न झाल्याने ते आपली व्यथा मांडत होते, व्हिडीओमध्ये कुठेही विटंबना दिसत नाही. मारहाणीचा प्रकार लपवण्यासाठी जाणीवपूर्वक विटंबनेचा खोटा रंग दिला जात आहे. आम्हाला न्याय मिळावा.” — कल्पना साळवे (पीडित शंकर साळवे यांच्या पत्नी) प्रशासनाची भूमिका – जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी शिष्टमंडळाशी सकारात्मक चर्चा केली असून, पुतळा पुन्हा बसवण्यासाठी योग्य जागा आणि कायदेशीर बाबींबाबत समोपचाराने मार्ग काढण्याचे आश्वासन दिले आहे. सद्यस्थितीत गावात शांतता राखण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.