Maharashtra Election : मधुरीमाराजेंनी माघार घेतल्यानंतर आता…, कोल्हापूरमध्ये काँग्रेसला आणखी एक धक्का !

कोल्हापूर : महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत कोल्हापूर उत्तर मतदारसंघ मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. गेल्या काही दिवसांत या ठिकाणी अनेक राजकीय घडामोडी घडल्या आहेत. कोल्हापूर उत्तरमधून काँग्रेसने विद्यमान आमदार जयश्री जाधव यांचं तिकीट कापून राजेश लाटकर यांना उमेदवारी दिली, पण काही तासांमध्येच काँग्रेसने राजेश लाटकर यांची उमेदवारी रद्द करून मधुरिमाराजे यांना तिकीट देण्यात आले होते.
यानंतर पक्षाच्या आदेशानुसार मधुरिमाराजे यांनी काँग्रेसच्या एबी फॉर्मवर अर्जही दाखल केला, पण अर्ज मागे घ्यायच्या शेवटच्या दिवशी मधुरिमाराजे यांनी माघार घेतली. मधुरिमाराजे यांच्या या भूमिकेमुळे कोल्हापूर उत्तरमधून काँग्रेसचं पंजा चिन्ह गायब झालं, त्यामुळे काँग्रेसला अपक्ष रिंगणात उतरलेल्या राजेश लाटकर यांना पाठिंबा द्यावा लागला आहे.
कोल्हापूर उत्तरमध्ये काँग्रेसला दुसरा धक्का
कोल्हापूर उत्तरचा हा वाद संपत नाही तोच पुन्हा एक नवा ट्वीस्ट आला आहे. मधुरिमाराजे यांनी माघार घेतल्यानंतर त्यांचे बंधू विश्वविजय खानविलकर यांनी शिवसेनेचे उमेदवार राजेश क्षीरसागर यांना पाठिंबा दिला आहे. खानविलकर गटाने फक्त राजेश क्षीरसागर यांनाच नाही तर कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीला पाठिंबा दर्शवला आहे. यामुळे हा मतदारसंघ पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.





