नेवासा: एसटी प्रवर्गात समावेशासाठीचे धनगर समाजाचे उपोषण 11व्या दिवशी स्थगित; भाजप नेत्यांची शिष्टाई यशस्वी

नेवासा – धनगर समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करण्यात यावा या मुख्य मागणीसाठी नेवासाफाटा येथे धनगर समाजाच्या वतीने बुधवार (दि.१८) सप्टेंबर पासून सुरू झालेले राज्यव्यापी उपोषण शनिवारी (दि.२८) सप्टेंबर रोजी अकराव्या दिवशी स्थगित करण्यात आले. यासाठी भाजप नेत्यांनी शिष्टाई केली.
उपोषणस्थळी भाजपचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे पाटील, जिल्हा प्रभारी नवनाथ पडळकर, भाजपचे राज्य प्रवक्ते नितीन दिनकर, सामाजिक कार्यकर्ते शशिकांत तरंगे यांनी शासन दरबारी आम्ही हा मुद्दा उपस्थित करू त्यासाठी पाठपुरावा करू, अशी ग्वाही दिल्याने अकराव्या दिवशी हे राज्यव्यापी उपोषण स्थगित करण्यात आले.
अकरा दिवस चाललेल्या या राज्यव्यापी उपोषणाचे नेतृत्व उपोषणकर्ते राजूमामा तागड, प्रल्हाद सोनमारे, बाळासाहेब कोळसे, रामराव कोल्हे, देवीलाल मंडलिक, भगवान भोजने यांनी केले.
अकरा दिवस चाललेल्या या उपोषणाला बहुजन समाज बांधवांनी येथे भेट देऊन पाठिंबा जाहीर केला होता. त्यासाठी धनगर आरक्षण कृती समितीचे तालुकाध्यक्ष व भाजपचे जिल्हा चिटणीस अशोकराव कोळेकर यांनी आपल्या पंचक्रोशीतील पदाधिकाऱ्यांनी एकत्रित करून या उपोषणाला मोठे पाठबळ उभे केले होते.
गुरुवारी सकाळी दोन आंदोलनकर्त्यांनी प्रवरासंगम येथील गोदावरी नदीवर जाऊन आम्ही जलसमाधी घेत आहोत असे सांगून प्रशासनाची झोप उडवली होती. चार ते पाच वेळा आंदोलकांनी पुलावर रास्तारोको आंदोलनेही केली होती. दुसऱ्या दिवशी आंदोलनकर्ते चप्पूवर झोपले असल्याचे मच्छीमारी करणाऱ्या व्यक्तीने सांगितले. त्यानंतर पोलीस प्रशासनाने सुटकेचा निश्वास सोडला होता. सदरचे दोन्हीही आंदोलनकर्त्यांनी उपचार न घेता पुन्हा उपोषणात सहभाग नोंदवला होता.
उत्तरप्रदेशमध्ये धनगड समाजाला एसटीमध्ये आरक्षण आहे, त्यामुळे धनगर व धनगड हे एकच असल्याने राज्यातील धनगर समाजाला एसटी मध्ये आरक्षण मिळावे तसेच पोलिसांनी आमच्यावर लादलेले खोटे गुन्हे मागे घ्यावेत, अशी आंदोलनकर्त्यांची मागणी होती.
भाजपचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे पाटील, भाजपचे राज्य प्रवक्ते नितीन दिनकर यांनी राज्य सरकारकडे आपल्या मागणीसाठी पाठपुरावा करू तसेच उपोषण प्रसंगी पोलीस प्रशासनाने लादलेले गुन्हे वरिष्ठांना भेटून ते मागे घेण्यासाठी प्रयत्न करू, अशी ग्वाही उपोषणकर्त्यांना दिल्याने उपोषणकर्त्यांनी शिष्टाई करणाऱ्या भाजप नेत्यांचा मान राखत हे उपोषण अकराव्या दिवशी स्थगित केले. यावेळी विठ्ठलराव लंघे पाटील व नितिन दिनकर या भाजप नेत्यांच्या हस्ते नारळ पाणी देऊन व सर्वांना हार घालून सत्कार करत उपोषण सोडण्यात आले.
यावेळी उपोषणाला मार्गदर्शन करून पाठबळ देणारे धनगर आरक्षण कृती समितीचे नेते व भाजपचे जिल्हा चिटणीस अशोकराव कोळेकर, धनगर समाज संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय खेमनर, आसाराम महानोर अण्णासाहेब बाचकर, अक्षय वर्पे, जेष्ठ कार्यकर्ते कचरू तात्या भागवत, युवा नेते अजय कोळेकर, भरत काळे, संभाजी लोंढे, निलेश महानोर, रामदास नजन, राहुल नजन, भाऊसाहेब उघडे, बबनराव भानगुडे, देविदास मंडलिक, अंबादास माने, साहेबराव देवकाते, विठ्ठल खताळ, नंदू महानोर, नामदेव कराडे, ज्ञानेश्वर कराडे, लक्ष्मण कराडे, खंडू कराडे यांच्यासह पोलीस निरीक्षक धनंजय जाधव व त्यांचे पोलीस कर्मचारी उपस्थित होते. अशोकराव कोळेकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.
भारतीय जनता पार्टी नेहमीच धनगर बंधावासोबत – नितीन दिनकर
“भारतीय जनता पार्टी नियमित धनगर समाजाच्या सोबत आहे, यापुढेही पण राहणार आहे. धनगर समाजासाठी घरकुल योजना असेल तांडा वस्ती त्याचबरोबर राज्यामध्ये धनगर समाजासाठी अहिल्यादेवी होळकर भवन, राज्यातील धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमांमध्ये मोफत शिक्षण, धनगर आरक्षणासंदर्भात देखील सरकार सकारात्मक आहे. नगर जिल्ह्याचे नामांतर करून भाजपने अहिल्यादेवीनगर देखील केले आहे, भारतीय जनता पार्टी नेहमी धनगर बंधावा सोबत आहे,” अशी माहिती भाजपाचे प्रदेश प्रवक्ते नितीन दिनकर यांनी उपोषणकर्त्यांना दिली.





