Nepal Flood News : नेपाळमध्ये तामिळनाडूचे ५७ पर्यटक अडकले
पत्रात त्यांनी नमूद केले की, नेपाळमधील कठीण हवामान आणि भौगोलिक परिस्थितीमुळे मदतकार्यात अडथळे येत आहेत.

Nepal Flood News – नेपाळमध्ये भीषण महापुरामुळे निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, तेथे अडकलेल्या किंवा बेपत्ता असलेल्या भारतीय पर्यटकांच्या सुरक्षित सुटकेसाठी द्रमुक खासदार दयानिधी मारन यांनी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांना तातडीने हस्तक्षेप करण्याचे पत्र लिहिले आहे. तामिळनाडूतील ५० पर्यटक नेपाळमध्ये अडकले असल्याची माहिती आहे.
द्रमुक अध्यक्ष एम. के. स्टॅलिन यांच्या सूचनेनुसार खासदार मारन यांनी हे पत्र लिहिले आहे. पत्रात त्यांनी नमूद केले की, नेपाळमधील कठीण हवामान आणि भौगोलिक परिस्थितीमुळे मदतकार्यात अडथळे येत आहेत. तामिळनाडूतील सुमारे ५० पर्यटक बेपत्ता किंवा अडकलेले आहेत, ज्यामुळे त्यांच्या कुटुंबांमध्ये तीव्र चिंता पसरली आहे.
त्यांनी परराष्ट्र मंत्रालयाने नेपाळमधील भारतीय दूतावास आणि बचाव पथकांना तातडीने सूचना देऊन अडकलेल्या सर्व पर्यटकांना सुरक्षितपणे मायदेशी आणण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी केली आहे.
डॉ. कुंभकोणम, तंजावूर, तिरुवारूर आणि मायिलादुथुराई भागातील ५७ पर्यटकांपैकी २२ जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले असून ३७ जणांची माहिती अजून मिळालेली नाही, अशी चिंता त्यांनी व्यक्त केली. केंद्र आणि राज्य सरकारने नेपाळ सरकारशी समन्वय साधून बचाव मोहीम राबवावी, असे आवाहन त्यांनी केले.
भूस्खलन आणि पुरामुळे पर्यटक अडकल्याची बातमी धक्कादायक असल्याचे सांगत, पंतप्रधान कार्यालय आणि तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांनी परराष्ट्र मंत्रालयामार्फत जलद कारवाई करावी, अशी मागणी अनबुमणी रामदास आणि दिनाकरन या तामिळनाडूतील विरोधी पक्षनेत्यांनी केली आहे.




