“किसन वीर’मध्ये कोजनरेशन असोसिएशन ऑफ इंडियाची कार्यशाळा उत्साहात
कवठे – राज्यातील साखर कारखान्याबरोबर अन्य औद्योगिक क्षेत्रातील कंपन्यांना पर्यावरण समृध्दतेसाठी यापुढील काळात वेस्ट टु वेल्थ या संकल्पनेतून काम करावे लागणार आहे. प्रेसमडपासून व स्पेंटवॉशपासून सीएनजी आणि वीज निमिर्तीसाठी केंद्र सरकारकडून निश्चित धोरण ठरविण्यासाठी सर्वांनी एकत्र बसून एक संयुक्त समिती गठीत करणे गरजेचे असून त्यासाठी नाबार्ड, राज्य बॅंक, व्हीएसआय, मिटकॉन, राज्य साखर संघ, इतर कंपन्या व साखर कारखान्यांनी एकत्र येऊन त्यांची एक समिती तयार करण्याची गरज असल्याचे सांगत पर्यावरणपुरक इंधनाच्या निर्मीतीसाठी सामुहिक सहभाग आवश्यक असल्याचे प्रतिपादन, मदन भोसले यांनी केले.
किसन वीर सहकारी साखर कारखाना आणि कोजनरेशन असोसिएशन ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने कारखान्याच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात औद्योगिक कचऱ्यापासून बायोगॅस आणि त्यापासून सीएनजी व ऊर्जानिर्मिती याविषयावर एक दिवसाचे चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. यावेळी मदन भोसले बोलत होते. मदन भोसले म्हणाले, कारखान्यातून बाहेर पडणारी कोणतीही वस्तू टाकाऊ नसते त्याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे किसन वीर उद्योगात उभा राहिलेला सीएनजी प्रकल्प आहे. सीएनजी गॅसच्या प्रचार आणि प्रसार होण्यासाठी सीएनजी आऊटलेट उभारण्याची गरज असून त्यासाठी आवश्यक ते प्रयत्न करण्याची गरज आहे.
कारखान्याची डिस्टीलरी वर्षभर चालण्याची गरज त्यांनी यावेळी व्यक्त केली. नाबार्डचे एजीएम सुबोध अभ्यंकर यांनी आपल्या मनोगतात नाबार्ड ग्रामीण भागातील विकासाला चालना देण्यासाठी कटीबध्द असते. इस्माचे कार्यकारी संचालक चौगुले यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन कोजन असोसिएशनचे सुनिल नातू यांनी केले.या चर्चासत्रात विविध साखर कारखाने व औद्योगिक क्षेत्रातील नामांकित सुमारे 50 हुन अधिक कंपन्यांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. उद्योग क्षेत्रातील कचऱ्यापासून बायोगॅस आणि त्यापासून सीएनजी व ऊर्जानिर्मिती तयार करण्याबाबत अवंत गार्दे सिस्टिम ऍण्ड कंट्रोल प्रा. लि. चेन्नईचे के. मोहनकुमार, प्राज इंडस्टीज पुणेचे बसवराज, जी. जी. पॉवर नवी दिल्लीचे रविकुमार, सिसटन इंडिया पुणेचे नीलेश जाधव, उत्तम एनर्जीचे मुरलीधरन जयपाल व ग्रीन एलिफंटाचे संग्राम सिंग डायरेक्टर जनरल कांतीलाल उमप यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले.