Nasrapur Case: नसरापूर खटल्याचा महिन्याभरात निकाल? विशेष सरकारी वकिलांनी दिली मोठी माहिती
Nasrapur Case: संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडवून दिलेल्या नसरापूर येथील साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवरील अत्याचार आणि खून खटल्याची सुनावणी अंतिम टप्प्यात.

Nasrapur Case – संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडवून दिलेल्या नसरापूर येथील चिमुकलीवरील अत्याचार आणि खून खटल्याची सुनावणी आता अंतिम टप्प्यात आली आहे. या प्रकरणात आतापर्यंत ५३ जणांच्या साक्षी नोंदवल्या आहेत. त्यात अत्यंत महत्त्वपूर्ण पुरावे रेकॉर्डवर आले असून, वैद्यकीय पुरावे, वैज्ञानिक माहिती, बाल- साक्षीदाराची साक्ष आणि डीएनए प्रोफायलिंग या बाबींचा समावेश आहे.
उर्वरित दोन साक्षीदार एक सायबर तज्ज्ञ आणि मुख्य तपास अधिकारी (आयओ) यांच्या साक्षी नोंदविण्याचे काम सोमवारी (दि. १५) सुरू होणार आहे. दररोज चाललेल्या सुनावणीमुळे या खटल्याचा निकाल महिनाभराच्या आतच लागण्याची शक्यता असून, राज्याच्या इतिहासातील हा सर्वात जलद चाललेला खटला ठरू शकेल, असा विश्वास विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी व्यक्त केला. नसरापूर परिसरात दि. १ मे रोजी एका निष्पाप साडेतीन वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिचा खून केल्याची घटना घडली होती.
या प्रकरणात आरोपी भीमराव कांबळे या नराधमाला अटक करण्यात आली होती. विशेष न्यायालयात या खटल्याचे कामकाज सुरू आहे. पुणे ग्रामीण पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास पूर्ण करून जिल्हा न्यायालयात ११०० पानांचे दोषारोपपत्र दाखल केले. २९ मे रोजी न्यायालयात प्रत्यक्ष साक्ष नोंदविण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली. पहिल्या दिवशी पीडितेच्या आई- वडिलांची साक्ष नोंदवली गेली. या खटल्यात आजमितीला एकूण ५३ साक्षीदार तपासून झाले आहेत.
न्यायालयात तांत्रिक व डिजिटल पुराव्यांशी संबंधित ‘ई-साक्ष’ पोर्टलवरील साक्षीदार, घटनेची पुनर्रचना (सीन रिक्रिएशन) करणारे पंच आणि सीसीटीव्ही चित्रीकरण जप्त करणारे पंच अशा महत्त्वाच्या साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली. या खटल्याचे गांभीर्य लक्षात घेता, न्यायालयात दररोज सकाळी ११ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत सुनावणी घेतली जात आहे. त्यामुळे हा खटला जलदगतीने संपण्याची शक्यता आहे.




