Nasrapur Case: बुद्ध पौर्णिमेला घात, वटपौर्णिमेला न्याय! ! ५ वर्षीय चिमुरडीला न्याय मिळाल्यानंतर नसरापुरात भव्य कॅण्डल मार्च
Nasrapur Case: स्वप्नलोक टाऊनशिप ते विठ्ठल-रुक्मिणी मंदिरापर्यंत शांततेत फेरी; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि न्यायव्यवस्थेचे टाळ्यांच्या गजरात आभार.

Nasrapur Case – नसरापूर येथे साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवर झालेल्या अमानुष अत्याचार प्रकरणातील आरोपी भीमराव कांबळे याला न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर संपूर्ण नसरापूर गावात समाधानाची भावना व्यक्त करण्यात आली. या ऐतिहासिक निकालाबद्दल न्यायव्यवस्था, पोलीस प्रशासन तसेच शासनाचे आभार मानण्यासाठी अखिल गाव नसरापूर, व्यापारी असोसिएशन,
पत्रकार संघटना आणि ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी (दि. २९) सायंकाळी शांततेत भव्य आभार फेरी व कॅण्डल मार्च काढण्यात आला. स्वप्नलोक टाऊनशिप येथून सुरू झालेली ही आभार फेरी भैरवनाथ मंदिर मार्गे विठ्ठल-रुक्मिणी मंदिरापर्यंत काढण्यात आली. शेकडो ग्रामस्थ हातात मेणबत्त्या घेऊन सहभागी झाले होते. संपूर्ण मार्गावर शांतता पाळून न्याय मिळाल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
या प्रकरणाचा तपास अत्यंत वेगाने पूर्ण करून अवघ्या ५५ दिवसांत न्यायालयाने निकाल देत फाशीची शिक्षा सुनावली, ही महाराष्ट्रासह देशासाठी एक आदर्श बाब असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. भविष्यात महिला व बालकांवरील अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये नसरापूर प्रकरणाचा तपास व जलद न्यायनिवाड्याचा आदर्श देशभरातील न्यायालयांसमोर ठेवला जाईल, असा विश्वासही उपस्थितांनी व्यक्त केला.
यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश बिराजदार, राजगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष जाधव तसेच राजगड पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. घटना घडल्याच्या दिवशी आमच्या मनात दुःख, संताप आणि आक्रोश होता. त्या भावनेतून पोलीस प्रशासनाबद्दल आमच्या तोंडून काही अपशब्द गेले असतील तर त्याबद्दल आम्ही मनापासून दिलगिरी व्यक्त करतो.
पोलीस प्रशासनाने केलेल्या अथक प्रयत्नांमुळे आणि न्यायव्यवस्थेने दिलेल्या ऐतिहासिक निर्णयामुळे आज आमच्या गावाला न्याय मिळाला आहे, या भावनिक शब्दात ग्रामस्थांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. तसेच राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, न्यायव्यवस्था आणि संपूर्ण पोलीस यंत्रणेचे उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात आभार मानले. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थितांनी दोन मिनिटे मौन पाळून निष्पाप चिमुकलीला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
बुद्ध पौर्णिमेची घटना, वटपौर्णिमेला न्याय!
यावेळी ग्रामस्थांनी भावना व्यक्त करताना सांगितले की, एक तारखेला बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी घडलेल्या या दुर्दैवी घटनेचा निकाल आज वटपौर्णिमेच्या दिवशी लागणे हा एक भावनिक योगायोग आहे. या निर्णयामुळे संपूर्ण गावाला न्याय मिळाल्याची भावना निर्माण झाली असून, “नरकापूर” अशी ओळख निर्माण झालेल्या नसरापूरची प्रतिमा आता पुन्हा सन्मानाने उभी राहिली आहे.
५५ दिवसांत भक्कम तपास; राजगड पोलिसांचे विशेष कौतुक
उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश बिराजदार यांच्या नेतृत्वाखाली तपास अधिकारी विजयमाला पवार यांनी या प्रकरणाचा अत्यंत वेगाने आणि काटेकोर तपास पूर्ण केला. राजगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष जाधव तसेच संपूर्ण तपास पथकाने पुरावे भक्कमपणे न्यायालयासमोर मांडल्याने अवघ्या ५५ दिवसांत आरोपीला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली.





