Narhari Zirwal Not Reachable : राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ (Narhari Zirwal Not Reachable) यांच्या मंत्रालयातील कार्यालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) गुरुवारी मोठी कारवाई केली. मंत्रालयाच्या मुख्य इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर असलेल्या कार्यालयात क्लर्क राजेंद्र ढेरंगे याला ५० हजार रुपयांची लाच मागितल्यानंतर त्यातील ३५ हजार रुपये स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले. या प्रकरणामुळे मंत्री झिरवाळ यांच्या अडचणी वाढल्या असून, त्यांचा स्वीय सहाय्यक रामदास गाडे यांच्या सांगण्यावरून हे पैसे घेतल्याचे ढेरंगे यांनी चौकशीत कबूल केल्याचे समोर आले आहे. यानंतर मंत्री झिरवाळ हे ‘नॉट रिचेबल’ झाल्याचे दिसून येत आहे. प्रकरणाची पार्श्वभूमी एसीबीने प्राप्त तक्रारीनुसार, एका औषध दुकानदार/मेडिकल प्रॅक्टिशनरचा निलंबित परवाना पूर्ववत करण्यासाठी ढेरंगे यांनी ५० हजार रुपयांची लाच मागितली होती. त्यातील पहिली किश्त म्हणून ३५ हजार रुपये गुरुवारी स्वीकारताना एसीबीच्या पथकाने सापळा रचून त्याला अटक केली. या कारवाईनंतर मंत्री झिरवाळ यांचे कार्यालय सील करण्यात आले असून, तपास सुरू आहे. ढेरंगे हे मूळचे अन्न व नागरी पुरवठा विभागाचे कर्मचारी असून, मंत्री झिरवाळ यांच्या गावचे असल्याने उसनवारीवर त्यांच्या कार्यालयात नेमण्यात आले होते. Narhari Zirwal Not Reachable मंत्री झिरवाळ ‘नॉट रिचेबल’ या घटनेनंतर मंत्री नरहरी झिरवाळ यांच्याशी संपर्क साधण्याचे प्रयत्न फोल ठरले. नाशिकमध्ये आयोजित राज्यस्तरीय आदिवासी साहित्य आणि संस्कृती संमेलनच्या उद्घाटनासाठी ते उपस्थित राहणार होते, मात्र ते कार्यक्रमाला गैरहजर राहिले. आयोजकांनी सांगितले की, झिरवाळ यांच्याशी संपर्क होत नसल्याने संमेलनात गोंधळ उडाला. मंत्री सकाळपासूनच ‘नॉट रिचेबल’ असल्याचे समोर आले आहे. छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया या प्रकरणावर बोलताना मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटले की, “पोलिस चौकशी सुरू आहे. चौकशी पूर्ण झाल्यानंतर सत्य समोर येईल. मंत्री झिरवाळ यांनी स्वतः सांगितले आहे की, त्यांचे नाव किंवा संबंध आढळल्यास ते राजीनामा देतील. त्यामुळे चौकशीला पूर्ण वेळ द्या.” भुजबळ यांनी प्रकरणाची गंभीर दखल घेत चौकशीवर भर दिला आहे. मंत्री झिरवाळ यांची भूमिका मंत्री नरहरी झिरवाळ यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना सांगितले की, “ही घटना दुर्दैवी आणि चुकीची आहे. मी कुणालाही पाठीशी घालणार नाही. माझ्याशी किंवा माझ्या कार्यालयाशी याचा कोणताही संबंध सिद्ध झाल्यास मी निश्चितपणे राजीनामा देईन.” ते म्हणाले की, ते मुंबईत नव्हते आणि या कारवाईबाबत त्यांना आधी माहिती नव्हती. या घटनेमुळे महायुती सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप तीव्र झाले असून, विरोधकांकडून राजीनाम्याची मागणी होत आहे. एसीबीचा तपास पुढे नेमके काय उघड होईल, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. या प्रकरणाने राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.