Narendra Modi: भारत लवकरच जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल – पंतप्रधान नरेंद्र मोदी

Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी सांगितले की, भारतात सेमीकंडक्टर कारखान्यांची स्थापना सुरू झाली असून, यावर्षीच्या अखेरीस पहिली ‘मेड इन इंडिया’ चिप बाजारात येईल. भारत लवकरच जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल, असेही त्यांनी नमूद केले. राष्ट्रीय राजधानीत आयोजित एका कार्यक्रमात बोलताना पंतप्रधानांनी ‘मेड इन इंडिया 6G’ वर सरकार जलद गतीने काम करत असल्याचे सांगितले.
“भारतात सेमीकंडक्टर निर्मिती ५०-६० वर्षांपूर्वी सुरू होऊ शकली असती, पण ती संधी आपण गमावली. मात्र, आता परिस्थिती बदलली आहे. यावर्षीच्या अखेरीस पहिली स्वदेशी चिप बाजारात येणार आहे,” असे मोदी म्हणाले. ते पुढे म्हणाले, “भारत आज जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे. लवकरच आपण तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनू. जागतिक विकासात भारताचा वाटा २० टक्क्यांपर्यंत वाढेल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. गेल्या दहा वर्षांत आलेली अर्थव्यवस्थेतील स्थिरता यामागील प्रमुख कारण आहे.”
बँका अधिक मजबूत, व्यापार तूट कमी –
पंतप्रधानांनी सांगितले की, व्यापार तूट ४.४ टक्क्यांपर्यंत खाली येण्याची शक्यता आहे. “कोरोनासारख्या आव्हानांना सामोरे गेल्यावरही आपण हे साध्य केले आहे. भारतीय कंपन्या भांडवली बाजारातून विक्रमी निधी उभारत आहेत. बँका पूर्वीपेक्षा अधिक मजबूत झाल्या आहेत. महागाई कमी आहे, व्याजदर नियंत्रणात आहेत, आणि विदेशी मुद्रा साठा मजबूत आहे. दरमहा लाखो गुंतवणूकदार एसआयपीद्वारे हजारो कोटींची गुंतवणूक करत आहेत,” असे त्यांनी नमूद केले.
अवकाश क्षेत्रात ६० हून अधिक यशस्वी मोहिमा –
मोदींनी अवकाश क्षेत्रातील प्रगतीवरही प्रकाश टाकला. “गेल्या ११ वर्षांत ६० हून अधिक अवकाश मोहिमा यशस्वी झाल्या आहेत. यावर्षी ‘स्पेस डॉकिंग’ क्षमता प्राप्त झाली आहे, जी भविष्यातील मोहिमांसाठी महत्त्वाची आहे. ‘गगनयान’ मोहिमेद्वारे भारतीय अंतराळवीरांना अवकाशात पाठवण्याची तयारी सुरू आहे. ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांचा अनुभव यात मोलाचा ठरेल,” असे ते म्हणाले.
संसदेत सुधारणांचा धडाका
नुकत्याच संपलेल्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनात अनेक सुधारणा विधेयके मंजूर झाल्याचे मोदींनी सांगितले. “विपक्षाच्या व्यत्ययानंतरही ‘जन विश्वास विधेयक २.०’ मंजूर झाले. ६० वर्षे जुन्या आयकर कायद्यात सुधारणा, खनन आणि शिपिंगशी संबंधित ब्रिटिशकालीन कायद्यांमध्ये बदल, तसेच क्रीडा क्षेत्रात नवीन राष्ट्रीय क्रीडा धोरण आणले गेले आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले. याशिवाय, वस्तू व सेवा कर (जीएसटी) मध्ये सुधारणा दिवाळीपर्यंत पूर्ण होईल, ज्यामुळे करप्रणाली अधिक सुलभ होईल आणि वस्तूंचे दर कमी होतील, असेही ते म्हणाले.‘
रिफॉर्म, परफॉर्म, ट्रान्सफॉर्म’चा मंत्र –
“भारत ‘रिफॉर्म, परफॉर्म, ट्रान्सफॉर्म’ या मंत्रावर चालतो आहे. आपण जागतिक अर्थव्यवस्थेला मंदीच्या खाईतून बाहेर काढण्याची क्षमता ठेवतो. आम्ही ते लोक नाहीत जे साचलेल्या पाण्यात खडे फेकून बसून राहू. आम्ही ते लोक आहोत जे वेगाने वाहणाऱ्या पाण्याचा प्रवाह देखील वळवू शकतात,” असे म्हणत पंतप्रधानांनी भारताच्या प्रगतीबद्दल विश्वास व्यक्त केला.





