नाशिक : धार्मिक सण आणि स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर मालेगाव महानगरपालिकेने १५, २० आणि २७ ऑगस्ट रोजी शहरातील सर्व कत्तलखाने, मटण आणि चिकन दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. छत्रपती संभाजीनगर महापालिकेनेही १५ ऑगस्टला कत्तलखाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मालेगाव महापालिकेच्या आदेशानुसार, १५ ऑगस्ट (स्वातंत्र्य दिन), २० ऑगस्ट (श्रीकृष्ण जयंती) आणि २७ ऑगस्ट (जैन संवत्सरी, गणेश चतुर्थी) या दिवशी सर्व मांसविक्री आणि कत्तलखाने बंद राहतील. धार्मिक सौहार्द आणि सार्वजनिक शांतता राखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर परवाना रद्द, दंड किंवा गुन्हा दाखल अशी कठोर कारवाई होईल, असा इशारा महापालिकेने दिला आहे. छत्रपती संभाजीनगर महापालिकेने १५ ऑगस्ट रोजी कत्तलखाने बंद ठेवण्याचे आदेश जारी केले आहेत. कल्याण-डोंबिवलीत चर्चा सुरू – कल्याण-डोंबिवली महापालिकेत खाटीक समाजाने मटण विक्री बंदीच्या निर्णयावर निवेदन दिले आहे. अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे यांनी चर्चेनंतर निर्णय घेतला जाईल, असे सांगितले. ते म्हणाले, “हा निर्णय नवीन नाही. १९८८ पासून धार्मिक सणांदरम्यान कत्तलखाने बंद ठेवण्याची प्रथा आहे. स्थानिक परिस्थितीनुसार निर्णय घेतले जातील.” दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे रायगड जिल्हाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी १५ ऑगस्टला कत्तलखाने बंदीला विरोध केला. ते म्हणाले, “स्वातंत्र्य दिन हा धार्मिक सण नसून राष्ट्रीय सण आहे. खाण्याचा अधिकार संवैधानिक आहे. यावर बंदीचा कोणताही प्रयत्न आम्ही निषेधतो.”