Pandharpur : मुनगंटीवार वेटिंगवर तर शिंदेंच्या मंत्र्याला झटपट दर्शन! पंढरपुरात VIP दर्शनासाठी दुजाभाव केल्याची चर्चा
Pandharpur : पंढरपुरात मिळालेल्या वागणुकीमुळे मुनगंटीवार यांच्याकडून नाराजी व्यक्त

Pandharpur : आषाढी एकादशीनिमित्त लाखो भाविक पंढरपुरच्या दिशेने निघाले आहेत. या पार्श्वभूमीवर विठ्ठल मंदिरात सर्वसामान्य भाविकांना झटपट आणि सुलभ दर्शन मिळावे, याकरिता 15 जुलैपासून व्हीआयपी दर्शन पूर्णपणे बंद करण्यात आले आहे.
मात्र या निर्णयाच्या पहिल्याच दिवशी मोठा गोंधळ पाहायला मिळाला. व्हीआयपी दर्शन बंद असताना देखील शिवसेनेचे विद्यमान मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासोबत आलेल्या लोकांना थेट व्हीआयपी प्रवेश देण्यात आला.
धक्कादायक म्हणजे, याचदरम्यान विठ्ठलाच्या दर्शनासाठी आलेले भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या कुटुंबीयांना ताटकळत ठेवण्यात आले. यावरून भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांमध्येच दुजाभाव केला जात असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
नेमकं काय घडलं?
भाजपचे माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार हे कुटुंबासह विठ्ठल दर्शनासाठी पंढरपुरात आले होते. मात्र, मंदिर प्रशासनातील समन्वयाच्या अभावामुळे त्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना दर्शनासाठी बराच वेळ रांगेत ताटकळत उभे राहावे लागले.
दुसरीकडे, शिवसेनेचे विद्यमान मंत्री गुलाबराव पाटील हे मंदिरात पोहोचताच, प्रशासनाने तात्काळ तत्परता दाखवत त्यांना आणि त्यांच्यासोबत आलेल्या कार्यकर्त्यांच्या मोठ्या गोतावळ्याला थेट मुख्य गाभाऱ्यात व्हीआयपी दर्शन घडवून आणले.
गुलाबराव पाटलांची कबुली
याबाबत स्वत: गुलाबराव पाटील यांनी आपल्यासोबतच्या लोकांना आत सोडल्याची कबुली दिली. “आम्ही लोकप्रतिनिधी आहोत. तब्बल अडीचशे किलोमीटर अंतरावरून प्रवास करून विठ्ठलाच्या चरणी आलो आहोत. मग आम्हाला दर्शन मिळायलाच हवे. माझ्यासोबत आलेल्या लोकांनाही थेट सोडण्यात आले होते,” असे गुलाबराव पाटलांनी सांगितले.
दरम्यान, काही वेळाने मुनगंटीवार आणि त्यांच्या पत्नीला दर्शनासाठी आत सोडण्यात आले, मात्र त्यांच्यासोबत आलेल्या मित्र आणि नातेवाईकांना शेवटी बाहेरच थांबवण्यात आले. या प्रकारामुळे मुनगंटीवार यांनी प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त केली.
ते म्हणाले की, जिल्हाधिकाऱ्यांनी निमंत्रण दिले म्हणून मी आलो होतो. जर प्रशासनाने व्हीआयपी बंदीबाबत आधीच स्पष्ट कल्पना दिली असती, तर आम्ही दोन महिन्यांनंतर दर्शनाला आलो असतो. असं करण्यापेक्षा आधीच सांगायला हवं होतं. मंदिरात महसूल विभाग आणि मंदिर प्रशासनाचा ताळमेळ नसल्याचा आरोपही त्यांनी केला.
दरम्यान, आधीच राजकीय वर्तुळात अनेक कारणांमुळे मुनगंटीवार नाराज असल्याची चर्चा आहे. याचदरम्यान आता त्यांना पंढरपुरात मिळालेल्या या वागणुकीमुळे अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे. सर्वसामान्यांसाठी लागू केलेल्या नियमात पहिल्याच दिवशी लोकप्रतिनिधींमध्येच दुजाभाव पाहायला मिळाल्याने मंदिर प्रशासनावर जोरदार टीका होत आहे.
तर एकीकडे आषाढीच्या काळात लाखो गरीब वारकरी २४ ते ३० तास रांगेत उभे राहून विठ्ठलाच्या दर्शनाची वाट पाहत असतात. मात्र राज्याचे मंत्री आणि आमदारांना सहज दर्शन मिळाल्यास सर्वसामान्यांना कधी दर्शन मिळणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
हेही वाचा:






