Corruption In Maharashtra : देशाची आर्थिक राजधानी आणि सर्वाधिक महागड्या मालमत्तांचे शहर असलेल्या मुंबईत २०२५ मध्ये महाराष्ट्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) केवळ ३९ सापळा प्रकरणे नोंदवली. राज्यातील एकूण ६६९ प्रकरणांच्या तुलनेत हे प्रमाण केवळ सहा टक्के आहे. मात्र वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मते, ही आकडेवारी मुंबईतील भ्रष्टाचार कमी असल्याचे दर्शवत नाही, तर तक्रारी न होण्याचे प्रमाण अधिक असल्याचे अधोरेखित करते. एसीबीच्या आकडेवारीनुसार, २०२५ मध्ये राज्यभरात ६६९ सापळा प्रकरणांमध्ये ९८९ जणांना अटक करण्यात आली. मुंबईत ३९ प्रकरणे आणि ६३ आरोपी नोंदले गेले. याउलट नाशिकने १३८ प्रकरणे व २१० अटकांसह राज्यात अव्वल स्थान पटकावले. पुण्यात १२१ प्रकरणे व १७६ अटका झाल्या, तर छत्रपती संभाजीनगरमध्ये १०९ प्रकरणे व १६० आरोपी होते. ठाण्यात ८२ प्रकरणे नोंदवली गेली. अमरावती आणि नांदेडसारख्या तुलनेने लहान विभागांनीही मुंबईपेक्षा अधिक प्रकरणे नोंदवली. ‘वेळ हाच पैसा’ — मुंबईकरांची मानसिकता एका वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याने सांगितले, “ही आकडेवारी देशातील सर्वात श्रीमंत शहरातील प्रत्यक्ष भ्रष्टाचाराचे चित्र मांडत नाही. येथील लोक लाच देऊन पुढे जाणे पसंत करतात. त्यांच्यासाठी वेळ हाच पैसा आहे.” निवृत्त एसीबी अधिकाऱ्यांनी नमूद केले की सापळा रचण्यासाठी तक्रारीची पडताळणी, सरकारी पंच साक्षीदारांशी समन्वय आणि कडक कागदपत्रांची पूर्तता आवश्यक असते. म्हाडा, एमएमआरडीए आणि पालिकेसारख्या मोठ्या यंत्रणांमध्ये प्रवेश नोंदणी व कडक सुरक्षा व्यवस्थेमुळे गुप्त सापळे रचणे अवघड होते. एका निवृत्त उपअधीक्षकांनी सांगितले, “एसीबी कार्यालयापर्यंत पोहोचणे सोपे नाही. प्रवास खर्च, कायदेशीर प्रक्रिया आणि लागणारा वेळ अनेकदा लाचेच्या रकमेपेक्षाही जास्त असतो. त्यामुळे बहुतेक लोक तक्रारच करत नाहीत.” याउलट, द्वितीय श्रेणीच्या शहरांमध्ये आणि ग्रामीण भागांत तक्रारदार लाचेला विरोध करण्यास अधिक तयार असतात, असे अधिकाऱ्यांनी नमूद केले. महासाथीनंतर प्रकरणांमध्ये घसरण – आकडेवारीतून एक महत्त्वाचा कल दिसतो — करोनापूर्वी २०१८ मध्ये ८९१ आणि २०१९ मध्ये ८६६ सापळा प्रकरणे नोंदली गेली होती. २०२० मध्ये हा आकडा ६३० वर घसरला आणि तेव्हापासून तो ६०० ते ७०० च्या दरम्यानच राहिला आहे. अधिकाऱ्यांच्या मते, शासकीय सेवांचे डिजिटायझेशन आणि सुधारित देखरेख यंत्रणा यांमुळे काही प्रमाणात घट झाली असली तरी ते हे मान्य करतात की प्रत्यक्ष भ्रष्टाचारात तितकी घट झालेली नाही. विभागनिहाय आकडेवारीत महसूल विभागाने राज्यात सर्वाधिक १८६ सापळा कारवाया नोंदवल्या, तर महाराष्ट्र पोलिसांमध्ये १२० प्रकरणे दाखल झाली. मुंबईच्या तुलनेत नाशिकने तिप्पटाहून अधिक प्रकरणे नोंदवली असून आरोपींच्या संख्येतही नाशिकचे (२१०) आणि पुण्याचे (१७६) आकडे मुंबईच्या ६३ अटकांपेक्षा कितीतरी पटींनी जास्त आहेत.