Mumbai Rain : मुसळधार पावसामुळे मुंबई ठप्प.! शिंदे, फडणवीसांचे मुंबईकरांना आव्हान; ‘गरजेशिवाय घराबाहेर पडू नका…’

Eknath Shinde | Devendra Fadnavis | Mumbai Rain : राजधानी मुंबईत कालपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईकरांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. बस आणि मुंबईची जीवनवाहीनी मानली जाणारी लोकलसेवाही विस्कळीत झाल्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतो आहे. शहराच्या अनेक भागांत आजही म्हणजे सोमावारी पाऊस सुरू होता व अनेक ठिकाणी पाणी साचले होते. दरम्यान, सायंकाळच्या सुमारास बऱ्यापैकी पाणी ओसरल्यामुळे मध्य आणि पश्चिम रेल्वेची वाहतूक संथ गतीने सुरू झाली होती.
हवामान खात्याकडून सोमवारी दिवसभर पावसाची शक्यता अगोदरच वर्तवण्यात आली होती. शहरात काल रात्री आठ वाजेपासून आज सकाळी आठ वाजेपर्यंत म्हणजे १२ तासांत सरासरी ११५ मिमी पाऊस झाला. मुंबईच्या उपनगरांमध्ये १६८ मिमी तर पश्चिम उपनगरांमध्ये १६५ मिमी पावसाची नोंद झाली.
ठिकठिकाणी पाणी साचून राहील्यामुळे वाहतुकीच्या कोंडीचीही समस्या निर्माण झाली. सोमवारी मुंबई विमानतळाकडे जाणारी वाहतूक अत्यंत संथगतीने सुरू होती तर माटुंगा, कुर्ला परिसरात वाहतुकीचा वेग प्रचंड मंदावला होता. त्यामुळे वाहनचालक प्रचंड नाराजी व्यक्त करताना दिसत होते. परेल, हिंदमाता, दादर, माटुंगा, भांडुप, अंधेरी आदी भागांमध्ये रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू होता.
मुख्यमंत्र्यांचे आवाहन
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नियंत्रण कक्षातून पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेतला. रात्रभर प्रचंड पाऊस झाल्यामुळे ही परिस्थिती उदभवली असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. गेल्या दोन वर्षांत आपण भरपूर काम केले असल्यामुळे पाण्याचा निचरा वेगाने झाला असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.
कोणताही अनुचित प्रकार होणार नाही याकडे प्रशासनाचे लक्ष असून चौपाट्यांवर समुद्राच्या लाटा सुमारे चार ते साडेचार मीटर उंच उसळत असल्यामुळे नागरिकांनी तेथे जाणे टाळावे असे आवाहन त्यांनी केले. पावासमुळे निर्माण झालेली परिस्थिती पाहुन आज शाळांना सुटी देण्यात आली होती. नागरिकांची गैरसोय झाली असली तरी स्थिती पूर्वपदावर येत असल्याचा दावा त्यांनी केला.
राजकारण करू नका
विरोधी पक्षांच्या नेत्यांना उद्देशून मुख्यमंत्री म्हणाले की लोकांना मदत करण्याची आताची वेळ आहे त्यामुळे कोणी राजकारण करू नये. कमी वेळेत मर्यादेबाहेर पाऊस पडला तर काही समस्या निर्माण होतात. मात्र पाण्याचा निचराही वेगाने झाला आहे. आपण मुख्य सचिवांच्या संपर्कात असून लोकलही पूर्वपदावर येते आहे. परिस्थितीनुसार जे काही निर्णय घ्यावे लागतील ते घेतले जातील. विरोधी पक्षांनी टीका करण्याऐवजी सरकारने जे चांगले काम केले आहे ते मान्य करावे.
लोकल सेवेवर परिणाम
मुंबईसह ठाण्यातही मुसळधार पाऊस झाल्यामुळे मध्य आणि हार्बर रेल्वेवर त्याचा परिणाम झाला. रूळावर पाणी साचल्यामुळे ठाण्याहून वाशीकडे जाणाऱ्या गाड्या रूळावरच उभ्या होत्या. मुंबईकडे सर्व रेल्वे वाहतूक ठप्प झाली होती. कर्जत- खोपोली, कसाऱ्याकडून सीएसएमटीकडे येणाऱ्या लोकल फक्त ठाण्यापर्यंत सुरू होत्या. पुणे- मुंबई असा प्रवास करणाऱ्यांनाही पावसाचा फटका बसला. पुण्याहून मुंबईकडे येणारी सिंहगड एक्स्प्रेस आणि डेक्कन क्वीन देखील रद्द करण्यात आली. त्यामुळे प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला.
फडणवीस यांचे मुंबईकरांना आवाहन
भरती आणि मुसळधार पाऊस दोन्ही एकत्र येतात तेंव्हा परिस्थिती जरा कठीण होते असे नमूद करून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले पोलीस विभागासह संपूर्ण प्रशासन मदतीसाठी प्रयत्नशील आहे. नागरिकांनी अगदी आवश्यक असेल तरच घराबाहेर पडावे. सगळ्यांनी सुरक्षित ठिकाणी राहावे आणि काळजी घ्यावे असे आवाहन त्यांनी केले.





