Mumbai Politics : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्यातील अलीकडील भेटीनंतर मुंबईच्या राजकारणात नवा ट्विस्ट आला आहे. या भेटीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेकडील नामनिर्देशित नगरसेवकांची नावे अंतिम करत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. शिवसेना उबाठाकडून साईनाथ दुर्गे, माधुरी मांजरेकर आणि कैलाश पाठक या तिघांच्या नावांना मंजुरी देण्यात आली असून २८ फेब्रुवारी रोजी अधिकृत घोषणा होणार आहे. राजकीय वर्तुळात याकडे मनसेसाठी धक्का म्हणून पाहिले जात आहे. मनसेची अपेक्षा धुळीस? मनसेकडून नामनिर्देशित नगरसेवकांपैकी एक जागा मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली होती. मनसेचे प्रतिनिधी यशवंत किल्लेदार यांनीही अशी आशा व्यक्त केली होती. मात्र, उद्धव ठाकरे यांनी तिन्ही नावे अंतिम करून मनसेच्या अपेक्षांना धक्का दिल्याची चर्चा आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) निवडणुकीनंतर शिंदे आणि राज ठाकरे यांच्यातील ही पहिलीच औपचारिक भेट मानली जात आहे. मुंबईतील नंदनवन निवासस्थानी झालेल्या या बैठकीत विविध राजकीय मुद्द्यांवर चर्चा झाल्याचे सांगितले जाते. BMC निवडणुकीत भाजपने ८९ जागा जिंकल्या, तर शिंदे गटाच्या शिवसेनेने २९ जागा मिळवत ११४ चा बहुमताचा आकडा पार केला. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने ६५ जागा जिंकल्या, तर राज ठाकरे यांच्या मनसेला ६ जागांवर समाधान मानावे लागले. भाजपच्या रितू तावडे यांची बृहन्मुंबई महानगरपालिका महापौरपदी निवड झाली आहे. यामुळे मुंबईतील दीर्घकाळाचे शिवसेनेचे वर्चस्व संपुष्टात आले आहे. दरम्यान, शिंदे गटाला उद्धव ठाकरे गट कट्टर प्रतिस्पर्धी मानत असून, मनसे आणि ठाकरे गटातील संबंधांवरही या घडामोडींचा परिणाम होण्याची शक्यता आहे. आगामी काळात मुंबईच्या राजकारणात आणखी बदल पाहायला मिळण्याची चिन्हे आहेत.