Mumbai Air Pollution: प्रदुषित हवेमुळे मुंबईकर सर्दी, खोकल्याने त्रस्त; हवा ‘वाईट’ ते ‘अतिवाईट’ श्रेणीत

Mumbai Air Pollution – गेले अनेक दिवस मुंबईत हवेतील प्रदूषणाबरोबरच वातावरणातील बदलामुळे खोकला, सर्दी यांसारख्या आजारांना मुंबईकरांना सामोरे जावे लागत आहे. तापमान कमी झाल्याने हवेतील प्रदुषित घटक वातावरणाच्या खालच्या थरातच स्थिरावतात. हे धूलिकणांमुळे कोरडा खोकला, सर्दी, घसा खवखवणे आदी त्रास होत आहे. यातून बरे होण्यासाठी १० ते १५ दिवस लागत आहेत.
वाहनांमधून बाहेर पडणारा धूर, बांधकामाच्या ठिकाणी उडणारे धुलीकण मुंबईच्या हवेत वर्षभर असतात. मात्र, दिवसा तापमान वाढल्यानंतर हवेचा जमिनीलगतचा थर वर जातो आणि त्यासोबत प्रदुषित घटकांचे प्रमाणही कमी होते. थंडीच्या दिवसात मात्र जमिनीलगतची हवा तिथेच राहते व हवेतील धूर, धूलिकण श्वसनावाटे शरीरात जातात.
त्यामुळे खोकला, घसा खवखवणे, कोरडा खोकला असा त्रास होतो, असे तज्ज्ञांनी सांगितले. मुंबईत नोव्हेंबर आणि डिसेंबर या कालावधीत हवेचे प्रदूषण वाढते. यावेळी मुंबईतील हवा ‘वाईट’ ते ‘अतिवाईट’ श्रेणीत असते. यंदा हवा दीर्घकाळ ‘वाईट’ श्रेणीतच नोंदली गेली आहे. रोगप्रतिकारकशक्ती कमी असलेल्या रुग्णांमध्ये संसर्गाचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे.
श्वसनविकार, मधुमेहाचा त्रास असलेल्यांनी या कालावधीत विशेष काळजी घेण्याची गरज आहे, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले. या रुग्णांनी त्यांची सुरू असलेली औषधे, आहार वेळेत घ्यावा जेणेकरून हवा बदलाचा परिणाम आरोग्यावर होणार नाही. खोकल्यावर अनेकदा घरगुती औषध घेतले जाते. प्रदुषणाची वाढलेली पातळी लक्षात घेता खोकल्यावर सतत घरगुती औषधांचा अतिरेक करू नये, यामुळे तात्पुरते बरे वाटते. मात्र, खोकला अनेक दिवस तसाच राहतो. खोकला तीनपेक्षा अधिक दिवस असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार घ्यावेत, असा सल्ला श्वसनविकारतज्ज्ञांनी दिला.
मुंबईच्या हवेत सध्या १० मायक्रोमीटरपेक्षा कमी व्यासाच्या धूलिकणांचे प्रमाण वाढले आहे. शरीराच्या संरचनेमुळे १० मायक्रोमीटरपेक्षा आकाराने मोठे असलेले धूलिकण शरीरात प्रवेश करू शकत नाहीत. मात्र २.५ ते ५ मायक्रोमीटर आकाराचे कण नाक, कान, घसा, स्वरयंत्र यांना अपाय करतात.
तातडीने उपयायोजनांची गरज
सर्दी, खोकला, शिंका यासोबत डोळ्यांची आगही होते. २.५ मायक्रोमीटरपेक्षा कमी आकाराचे धूलिकण थेट फुफ्फुसात प्रवेश करून तेथे जमा होण्याचीही शक्यता असते. यामुळे दमा, श्वसनाचे विकार बळावण्याची शक्यता असते. या सर्वाचा विचार करता मुंबईच्या हवेतील धूलिकण कमी करण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची गरज असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले.
कुलाबा, वरळी प्रदुषितच
एकीकडे तापमान कमी झालेले असून दुसरीकडे हवेतील वाढलेल्या प्रदूषणाचा त्रास वाढला आहे. कुलाबा, वरळी, अंधेरी आणि मालाड परिसरात मागील काही दिवस वाईट हवेची नोंद होत आहे. येथे पीएम २.५ धूलिकणांचे प्रमाण अधिक आहे. यामुळे सर्दी, खोकल्याचे प्रमाण वाढण्याची शक्यता असते.





