Mulshi News – घोटावडे (ता. मुळशी) परिसरात डोंगरातून येणाऱ्या मोकाट जनावरांच्या कळपांनी उच्छाद मांडला असून, काढणीला आलेली रब्बी पिके धोक्यात आली आहेत. गेल्या पाच-सात वर्षांपासून सुरू असलेल्या या त्रासामुळे शेतकरी हवालदिल झाले असून, प्रशासनाने तातडीने बंदोबस्त न केल्यास मुळा नदीत ‘जलसमाधी’ घेण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. या संदर्भात घोटावडे येथील रोकडोबा मंदिर परिसरात शेतकऱ्यांची नुकतीच तातडीची बैठक पार पडली. यावेळी शेतकऱ्यांनी आपली संतप्त भावना व्यक्त केली. वारंवार निवेदने देऊनही मुळशी कृषी, महसूल किंवा वन विभागाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने आता आरपारची लढाई लढण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे. घोटावडे परिसरात गाय, बैल आणि वळूंचे मोठे कळप मोकाट फिरत आहेत. अतिवृष्टी किंवा दुष्काळ अशा नैसर्गिक आपत्तींपेक्षाही या जनावरांच्या उपद्रवामुळे शेती करणे आता अशक्य झाल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. रात्रभर मेहनत करूनही डोळ्यादेखत पिकांचा नाश होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड मनस्ताप आहे. “वन, कृषी आणि महसूल विभागाने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन या गुरांना तातडीने रेस्क्यू करावे. पिकांच्या नुकसानीचा पंचनामा करून शेतकऱ्यांना मदत मिळणे आवश्यक आहे. शेतकरी टिकला तरच शेती टिकेल, यासाठी प्रशासनाने तत्परता दाखवावी.” – शरद गोडांबे, राज्य समन्वयक सदस्य, पशुसंवर्धन विभाग हिंस्त्र वळूंची धास्ती; रात्रभर जागता पहारा सुमारे ३० ते ४० जनावरांचा हा कळप दिवसा वनविभागाच्या हद्दीत असतो आणि रात्री शेतात शिरून पिकांचा फडशा पाडतो. पिके वाचवण्यासाठी शेतकरी जीव मुठीत धरून रात्रभर पहारा देत आहेत. मात्र, कळपातील काही वळू हिंस्त्र झाले असून, ते हाकलण्यासाठी जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या अंगावर धावून येत आहेत. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.