India Test Captaincy : गिल किंवा पंतला नव्हे, तर ‘या’ खेळाडूला कर्णधार करा; एमएसके प्रसाद यांची मागणी

Who is India’s Test captain : टीम इंडिया जूनमध्ये इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात भारतीय संघ इंग्लंडसोबत ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. ज्याबाबत बीसीसीआय लवकरच टीम इंडियाची घोषणा करू शकते. इंग्लंड दौऱ्यापूर्वी रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे, त्यानंतर आता मोठा प्रश्न असा आहे की कसोटी संघाचा नवा कर्णधार कोण असेल? अशात निवड समितीचे माजी सदस्य एमएसके प्रसाद यांनी बुमराहचे नाव सुचवले.
रोहित शर्मानंतर जसप्रीत बुमराहला कसोटी संघाचा पुढचा कर्णधार म्हणून पाहिले जात असले तरी, अहवालानुसार, बुमराह इंग्लंड दौऱ्यातील सर्व सामने खेळू शकणार नाही. अशा परिस्थितीत कर्णधार म्हणून शुबमन गिलच्या नावाचा विचार केला जात असल्याची चर्चा आहे. निवड समितीचे माजी सदस्य एमएसके प्रसाद यांनी बुमराहच्या नावालाच प्राधान्य दिले आहे.
एमएसके प्रसाद यांची बुमराहच्या नावाला दिली पसंती –
टीम इंडियाचे माजी निवड समिती सदस्य एमएसके प्रसाद यांनी इंडिया टुडेला सांगितले की, “जसप्रीत बुमराह का नाही, यार? का नाही? तो आता तंदुरुस्त आहे. सध्या तुमच्याकडे तीन पर्याय आहेत: बुमराह, शुबमन गिल आणि केएल राहुल. हे तीन पर्याय आहेत. जर तुम्ही बुमराहकडे पाहत असाल तर तो या आणि पुढच्या दोन्ही टप्प्यात खेळेल हे स्पष्ट आहे, त्यामुळे काहीही चुकीचे नाही. कारण त्याला नेतृत्व करण्यासाठी ज्या काही संधी मिळाल्या आहेत, त्यावेळी त्याने खूप चांगली कामगिरी केली आहे.”
हेही वाचा – Virat Kohli Retirement : “विराट, प्लीज रिटायरमेंट घेऊ नकोस…”, अंबाती रायुडूची किंग कोहलीला भावनिक विनंती
ऑस्ट्रेलिया दौऱ्यात बुमराहने भूषवले होते कर्णधारपद –
टीम इंडियाचे नेतृत्व करण्याचा जसप्रीक बुमराहला खूप चांगला अनुभव आहे. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या पहिल्या आणि पाचव्या कसोटीत बुमराहने भारताचे नेतृत्व केले, ज्यापैकी टीम इंडियाने एक जिंकला आणि एक गमावला होता. दुखापती आणि कामाच्या ताणामुळे निवड समिती बुमराहला कर्णधार बनवण्यास उत्सुक नव्हती, असे वृत्त आहे. अशाच एका वृत्तानुसार, बुमराहला इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी उपकर्णधारपदही दिले जाणार नाही कारण तो पाचही कसोटी सामने खेळण्याची अपेक्षा नाही.





