MSEDCL Load Shedding : उन्हाच्या झळांनंतर आता महावितरणचा शॉक! ८ तासांची वीज ६ तासांवर; पिके करपण्याची भीती
MSEDCL Load Shedding : मान्सूनपूर्व पावसाने पाठ फिरवल्याने आणि कडक उन्हामुळे पिके करपण्याच्या मार्गावर; महावितरणकडून कृषीपंपाच्या विजेत दोन तासांची कपात.

MSEDCL Load Shedding – मागील दोन महिन्यांपासून दिवसेंदिवस वाढत्या उन्हाच्या झळांनी शेतकरी मेटाकुटीस आला आहे. यातच मान्सूनपूर्व पावसाने पाठ फिरवल्याने कडक उन्हामुळे हिरवीगार पिके करपू लागली असून पाण्याच्या वाढलेल्या फेरामुळे शेतकऱ्यांची धावपळ वाढली आहे. दिवस-रात्र मिळेल त्या वेळेत पिकांना पाणी देण्याची कसरत सुरू असतानाच महावितरणकडून कृषीपंपाच्या वीज पुरवठय़ात दोन तास कपात केल्याने शेतकऱ्यांची चिंता आणखी वाढवली आहे.
महावितरणकडून शेतीसाठी दिल्या जाणाऱ्या वीजपुरवठ्यात मागील काही दिवसांपासून दोन तासांची कपात करण्यात येत आहे. यापूर्वी आठ तास मिळणारी वीज आता फक्त सहा तास मिळत आहे. अगोदरच मागील काही महिन्यांपासून सुरू असलेल्या उष्णतेमुळे शेतातील जमीन तडकून भेगा पडल्या आहेत. विहिरी, कूपनलिका, नदीपात्रातील पाण्याची पातळी झपाट्याने घटली आहे.
परिणामी पाण्याचा पुरवठा अपुरा पडत असून अनेक ठिकाणी पंधरा ते वीस दिवसांनी पाण्याची पाळी मिळत आहे. त्यामुळे पिकांनी टाकल्या माना टाकल्या आहेत. वेळेवर पाणी न मिळाल्याने उभी पिके सुकू लागली आहेत. शेतकरी कसाबसा पिकांना जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, तापमानाचा पारा चाळिशीच्या दिशेने झुकल्याने शेतात काम करणेही कठीण झाले आहे.
ऊस, भाजीपाला, फळबागांवर संकट
मांडकी, जेऊर परिसरात सद्यःस्थितीत मुबलक पाणीसाठा आहे. मात्र, यासाठी वीज नसल्याने विहिरीतील पाणी पिकांना कसे देणार, असा प्रश्न शेतकरीवर्गापुढे निर्माण झाला आहे. पिके पाण्यावाचून सुकू लागली असून ऊस, भाजीपाला, फळपिकांच्या उत्पादनावर मोठा परिणाम होत आहे. दोन तासांची वीज कपातीमुळे अद्यापपर्यंत तग धरून राहिलेली पिकेही धोक्यात येत असून शेतकरीवर्ग चिंताग्रस्त आहेत.
“पूर्वेकडील वाड्या-वस्त्यांवर विहीरीची पाणीपातळी खलावली असून विहिरीतील पाण्याचा सकाळचा सांगळा (पाळी) किमान दोन तास चालले, तर पुन्हा चार-पाच तासांनंतर, किमान अर्ध्या तासाचा तरी पाणीसाठा विहीरीत जमा होऊन ते पाणी उपसता येते होते. म्हणून अजूनपर्यंत पिके तग धरून होती. मात्र, वीज कपात केल्यानंतर सकाळचा एकच सांगळा (पाळी) शेतकरीवर्गाला मिळत आहे. यातच अनेकदा लोडशेडिंग येत असल्याने पिकांचे नुकसान होत आहे. महावितरणे पुन्हा आठ तास वीजपुरवठा सुरळीत करावा.”
– धनंजय गायकवाड, वाल्हे शेतकरी.


