Monsoon Update : पावसाचा जोर कमी, पण ‘यलो अलर्ट’ कायम ; पुढील तीन दिवस पावसाचा अंदाज काय? जाणून घ्या

प्रभात वृत्तसेवा
पुणे – राज्यात मागील ७२ तासांत पावसाचा जोर ओसरला आहे. परिणामी बहुतांश जिल्ह्यात नद्यांना आलेली पूरस्थिती आटोक्यात येत असून, पुरामुळे विस्कळीत झालेले जनजीवनही पूर्वपदावर येऊ लागले आहे. दरम्यान, पुढील दोन ते तीन दिवस राज्यात पावसाच्या हलक्या ते मध्यम, तर तुरळक ठिकाणी जोरदार सरी पडतील, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे.नैऋत्य मोसमी वारे (मान्सून) परतीचा स्थिती कायम आहे.
वातावरणाच्या वरच्या थरातील चक्राकार स्थितीच्या प्रभावाखाली काल (दि. ३०) संध्याकाळी पूर्व मध्य बंगालच्या उपसगरावर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले होते. त्याचे रूपांतर आज (दि. १) ठळक कमी दाबाच्या क्षेत्रात झाले आहे. त्यामुळे कोकण-गोव्यात पुढील चार ते पाच दिवस बहुतांश जिल्ह्यात, तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात दोन दिवस पावसाची शक्यता आहे. मात्र, या पावसाचा जोर कमी असेल.
राज्यातील चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, अहिल्यानगर, बीड या जिल्ह्यांमध्ये पुढील दोन ते तीन दिवसांत जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे, तर काही जिल्ह्याम मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यासह पाऊस पडेल, त्यामुळे या सर्व जिल्ह्यांना हवामानशास्त्र विभागाकडून यलो अलर्ट देण्यात आला आहे. दरम्यान, मागील आठवड्यात मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भात जोरदार ते अतिजोरदार पावसामुळे नद्या, नाल्यांना पूर आले, काही गावांमध्ये पाणी घुसले.
परिणामी शेती, जनावरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. दोन ते तीन दिवस पुरस्थिती असल्याने बहुतांश गावांमधील जनजीवन विस्कळीत झाले. मात्र, गेल्या दोन ते तीन दिवसांपासून पावसाचा जोर ओसरल्यामुळे परिस्थिती आटोक्यात आली असून, शेतातील पाणीही कमी होऊ लागले आहे.





